अ‍ॅपशहर

करोनाने दगावल्यास मुंबई पालिका कामगारांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची भरपाई

कर्तव्यावर असताना एखाद्या पालिका कर्मचाऱ्याचा करोनाने मृत्यू झाल्यास त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केली. करोनामुळे दगावणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक भरपाई देणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिलीच महापालिका ठरली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Jun 2020, 6:27 pm
मुंबई: करोना प्रादुर्भावाच्या काळात जीवमुठीत घालून काम करणाऱ्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी मुंबई महापालिकेने एक योजना आणली आहे. या योजनेनुसार कर्तव्यावर असताना एखादा कर्मचारी करोनाने दगावल्यास त्याच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये भरपाई देण्यात येणार आहे. करोनामुळे दगावणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक भरपाई देणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिलीच महापालिका ठरली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bmc-worker


कर्तव्य बजावताना करोना बाधा होऊन मृत्यू पावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य देण्याची योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी या योजनेची घोषणा केली आहे. १ मार्च ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी ही योजना लागू राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशा प्रकारची योजना राबवणारी महानगरपालिका ही देशातील पहिलीच महानगरपालिका आहे. या योजनेमध्ये महानगरपालिकेच्या निधीमधूनच सहाय्य देण्यात येईल. सरकारच्या आदेशानंतर अवघ्या १० दिवसांत ही योजना तयार करुन ती लागू करण्यात आल्याचे महानगरपालिका प्रशासनाने आज जाहीर केले आहे.

या योजनेची वैशिष्ट्ये

कोविड १९ च्या अनुषंगाने सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार व मदत कार्ये या कार्यवाहीशी संबंधित कर्तव्यावर कार्यरत महानगरपालिकेतील विविध प्रवर्गातील कामगार/कर्मचारी आणि महानगरपालिकेने कंत्राटी कामगार, बाह्य स्त्रोतांद्वारे घेतलेले रोजंदारी/तदर्थ/मानसेवी कर्मचारी यांचा कोविड १९ संबंधित कर्तव्य बजावताना, कोविड १९ मुळे मृत्यू झाल्यास अशा प्रकरणांमध्ये ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य लागू असेल. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत, कोविड १९ शी सामना करणारे आरोग्य कर्मचारी यांचा विमा योजनेत यापूर्वीच समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे असे कर्मचारी वगळून इतरांसाठी हे सानुग्रह सहाय्य योजना लागू असेल.

या १० राज्यात घरोघरी सर्व्हे; वाढत्या आकड्यांनी केंद्र सरकारही चिंतेत

सानुग्रह सहाय्यासाठी निकष देखील निश्चित करण्यात आले आहेत. सदर कामगार, कर्मचारी हे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी किंवा मृत्यूच्या दिनांकापूर्वी १४ दिवसांच्या कालावधीमध्ये कर्तव्यावर हजर असणे आवश्यक असेल. ज्या प्रकरणांमध्ये कोविडची चाचणी झालेली नसेल किंवा चुकीच्या निगेटिव्ह अहवालाची शक्यता वाटत असेल, त्या प्रकरणांमध्ये महानगरपालिकेची सर्व अधिष्ठातांची समिती सर्व पडताळणी करुन अंतिम निर्णय घेईल.

नगरमध्ये रोखला बालविवाह; ११ वर्षीय मुलीच्या पित्याविरुद्ध गुन्हा

संबंधित कामगार, कर्मचारी यांचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांच्या वारसांना विविध दस्ताऐवजांसह अर्ज करावा लागेल. अर्जासोबत मृत कामगार, कर्मचारी यांचे ओळखपत्र, दावा कर्त्याचा ओळख पुरावा, मृत व दावाकर्ता यांच्यातील नातेसंबंधांचा पुरावा यांची प्रमाणित प्रत, कोविड १९ ची चाचणी पॉझिटिव्ह असल्याचा प्रयोगशाळेचा अहवालाची प्रमाणित प्रत, चाचणी झाली नसल्यास किंवा चाचणी चुकीचा निगेटिव्ह असल्याची शक्यता असल्यास त्या प्रकरणणंमध्ये अधिष्ठाता समितीचा अहवाल, संबंधित रुग्णालयाचा मृत सारांश, मृत्यू प्रमाणपत्राची मूळ प्रत आदी सादर करावे लागतील. कंत्राटी, बाह्य स्त्रोतांद्वारे, रोजंदारी, तदर्थ, मानसेवी तत्त्वावर कार्यरत कर्मचारी, कामगार यांच्या प्रकरणांमध्ये संबंधित खाते प्रमुखाचे प्रमाणपत्र आवश्यक असेल. सामाजिक संस्था/ठेकेदार यांच्यामार्फत नियुक्ती झाली असल्यास त्या कामाच्या अनुषंगाने महापालिकेकडे जमा केलेली वर्कमॅन कॉम्पेनसेशन पॉलिसी, संस्था नोंदणी प्रमाणपत्र, ईएसआय योजना आदींची प्रमाणित प्रत द्यावी लागेल.

फडणवीसांच्या काळातील 'या' बहुचर्चित IRS महिला अधिकाऱ्याची अखेर बदली

दावेदाराने अर्जासह आवश्यक ती सर्व कागदपत्रं संबंधित खात्याकडे सादर केल्यानंतर या अर्जाची पडताळणी करण्यात येईल. संबंधित खात्याने दावा तयार करुन तो प्रमुख कर्मचारी अधिकारी कार्यालयाकडे सादर केला जाईल. प्रमुख कर्मचारी अधिकारी खात्यामार्फत त्याची छाननी करुन ते प्रकरण प्रमुख लेखापाल (वित्त) खात्याकडे अधिदानासाठी देण्यात येईल.

>> दिनांक १ मार्च ते ३० सप्टेंबर २०२० कालावधीसाठी योजना लागू. वैशिष्ट्यपूर्ण बाबींचा समावेश.
>> महानगरपालिकेच्या निधीतूनच केली जाणार मदत.
>> नियमित कामगार/कर्मचारी यांच्यासह कंत्राटी, बाह्य स्त्रोतांद्वारे घेतलेले, मानसेवी, रोजंदारी, तदर्थ तत्त्वावरील कर्मचाऱयांनाही मिळणार सहाय्य
>> कोविड बाधित कामगार/कर्मचाऱ्यांवर महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये होणार मोफत उपचार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज