अ‍ॅपशहर

परीक्षा पुढे ढकलण्यास नकार

उशिरा प्रवेश झाल्याने अभ्यास करण्यास पुरेसा वेळच मिळाला नसल्याने प्रथम सत्र परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मुंबर्इ विद्यापीठाच्या एलएलबीच्या विद्यार्थ्यांनी मुंबर्इ उच्च न्यायालयाकडे केली होती.

Maharashtra Times 25 Jan 2018, 6:12 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mubai-university


उशिरा प्रवेश झाल्याने अभ्यास करण्यास पुरेसा वेळच मिळाला नसल्याने प्रथम सत्र परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मुंबर्इ विद्यापीठाच्या एलएलबीच्या विद्यार्थ्यांनी मुंबर्इ उच्च न्यायालयाकडे केली होती. मात्र परीक्षा पुढे ढकलून इतरांचे नुकसान करणे योग्य नाही, हे विद्यापीठाचे म्हणणे मान्य करीत न्यायालयाने परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला.

ज्या विद्यार्थ्यांना आता ही परीक्षा द्यायची नसेल त्यांनी आपला निर्णय आपल्या कॉलेज प्रशासनाला कळवावा आणि दुसऱ्या सत्राच्या परीक्षेसोबत ही परीक्षा द्यावी, असे खंडपीठाने सुचवले. त्याप्रमाणे ही परीक्षा देणार नसलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ व कॉलेजने नापास गृहित धरू नये आणि त्यांना दुसऱ्या सत्रासोबत पहिल्या सत्राची परीक्षा देण्यास परवानगी द्यावी, असे निर्देश देत खंडपीठाने संबंधित विद्यार्थ्यांना दिलासा दिला.

निकाल घसरू नये म्हणून...

मुंबई विद्यापीठाने एलएलबीचे वर्ग सुरू झाल्यानंतर फक्त महिनाभरातच वेळापत्रक जाहीर केल्याने बुधवारी एलएलबीच्या विद्यार्थ्यांनी फोर्ट कॅम्पसमध्ये जोरदार निदर्शने केली. विद्यार्थ्यांनी स्टुडंट लॉ कौन्सिलच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यावेळी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव दिनेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले. एलएलबी अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी जास्त असल्यामुळे निकाल ४० टक्क्यांपर्यंतच लागतो. असे असताना आता विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास वेळ मिळाला नाही तर निकाल आणखी खाली येण्याची भीती आहे. त्यामुळे विद्यापीठाने दोन पेपरमध्ये किमान तीन दिवसांचे अंतर ठेवावे, अशी मागणी केली असल्याचे स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज