रामदास आठवले यांची प्रतिक्रिया
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
देशातील मुस्लिम महिलांचा बुरखा आणि नकाब यावर बंदी घालण्याची शिवसेनेने केलेली मागणी चुकीची, घटनाबाह्य आहे. शिवसेनेच्या मताशी आपण कदापि सहमत नाही, असे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.
शेजारच्या श्रीलंकेतील दहशतवादी कारवायांचे उदाहरण पुढे करून भारतात बुरखा घालण्यावर बंदी घालण्याची मागणी चुकीची आहे, असे आठवले यांचे म्हणणे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे सर्वधर्मीयांना त्यांची संस्कृती परंपरा जोपासण्याचा समान अधिकार आणि स्वातंत्र्य दिले आहे. प्रत्येक मुस्लिम महिला दहशतवादी नसते. बुरखा घालण्याचा मुस्लिम महिलांचा परंपरागत हक्क आहे. त्यामुळे सरसकट सर्व मुस्लिम महिलांना बुरखा आणि नकाब घालण्यास बंदी घालण्याची मागणी करणे अयोग्य आहे, असे आठवले म्हणाले.
याबाबत काही जणांनी पंतप्रधानांकडे केलेली मागणी घटनाबाह्य असल्यामुळे ती मंजूर होऊ शकत नाही, असा दावा आठवले यांनी केला आहे. बुरखाबंदीच्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा विरोध राहील, असेही ते म्हणाले. उत्तर भारतात अनेक ठिकाणी हिंदू महिलासुद्धा आदराने चेहऱ्यावर पदर घेत असतात. ऊन आणि धुळीपासून संरक्षण करण्यासाठी, चेहरा झाकण्यासाठी स्कार्फ वापरला जातो. त्यामुळे सरसकट सर्वांना बुरखाबंदीची मागणी करण्याची मागणी चुकीची असल्याचे आठवले यांचे म्हणणे आहे.