अ‍ॅपशहर

विशेष फेरीतील १६ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेशास नकार

अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीतील प्रवेशाची मुदत संपल्यानंतर सुमारे ५० हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याचे समोर आले आहे. या फेरीतील १६ हजार १८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारल्याने हे विद्यार्थीही....

Maharashtra Times 23 Aug 2018, 4:00 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11th-admission


अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीतील प्रवेशाची मुदत संपल्यानंतर सुमारे ५० हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याचे समोर आले आहे. या फेरीतील १६ हजार १८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारल्याने हे विद्यार्थीही आता 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या फेरीत प्रवेशासाठी सहभागी होणार आहेत. यामुळे यंदा प्रथमच या फेरीतही चढाओढ असणार आहे.

प्रवेशाविना राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा म्हणून सर्व फेऱ्या पार पडल्यानंतर 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' ही फेरी राबविली जाणार आहे. मात्र यंदा या फेरीला नामांकित कॉलेजांतील जागाही रिक्त राहिल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी या फेरीला पसंती दिल्याचे प्रवेशाच्या आकडेवारीवरून समोर येत आहे. मुंबई विभागातून विशेष फेरीसाठी ४७ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३८ हजार ५६७ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते. यापैकी केवळ २२ हजार २९७ विद्यार्थ्यांनी कॉलेजांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित केला आहे. तर, १६ हजार १८१ विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. ६२ विद्यार्थ्यांनी मिळालेले प्रवेश रद्द केले आहेत. तसेच २७ विद्यार्थ्यांचे प्रवेश या ना त्या कारणामुळे कॉलेजांकडून नाकारण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली.

अन्य विभागांतही विशेष फेरी

मुंबईबरोबरच पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद या विभागांतही अकरावीचे ऑनलाइन प्रवेश सुरू आहेत. ही विशेष फेरी या विभागातही घेण्यात आली. या विशेष फेरीत राज्यभरात सर्व विभागातून ५८ हजार ६४३ विद्यार्थ्यांना प्रवेश दिले होते. त्यापैकी केवळ ३० हजार ४४० विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश घेतले आहेत, तर २८ हजार ७५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले नाहीत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज