अ‍ॅपशहर

सैंय्या भये कोतवाल... डर काहेका?

राज्य सरकारमधील काही कॅबिनेट व राज्यमंत्र्यांच्या कथित गैरव्यवहाराचे पुरावे विरोधकांनी सभागृहात सादर केल्यानंतर संबंधित मंत्र्यांना मुख्यमंत्री​ देवेंद्र फडणवीस क्लीन चिट देतात. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मंत्री स्वतःलाच निर्दोष असल्याचे खुलाशातून प्रमाणपत्र देतात. याचाच अर्थ राज्याचा कोतवालच ओळखीचा निघाल्याने त्या वादग्रस्त मंत्र्यांची हिंमत वाढली...

Maharashtra Times 27 Jul 2016, 4:15 am
दुसऱ्या दिवशीही ‘भ्रष्टाचार गोंधळ’, विधान परिषद तहकूब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dhananjay munde accuses chief minister
सैंय्या भये कोतवाल... डर काहेका?


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

राज्य सरकारमधील काही कॅबिनेट व राज्यमंत्र्यांच्या कथित गैरव्यवहाराचे पुरावे विरोधकांनी सभागृहात सादर केल्यानंतर संबंधित मंत्र्यांना मुख्यमंत्री​ देवेंद्र फडणवीस क्लीन चिट देतात. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मंत्री स्वतःलाच निर्दोष असल्याचे खुलाशातून प्रमाणपत्र देतात. याचाच अर्थ राज्याचा कोतवालच ओळखीचा निघाल्याने त्या वादग्रस्त मंत्र्यांची हिंमत वाढली, असा आरोप करून, त्या मंत्र्यांवरील आरोपांची शहानिशा करण्यासाठी​ कमिशन ऑफ एन्क्वायरी अॅक्टखाली विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. चौकशी जाहीर होत नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा दोन्ही काँग्रेससह विरोधी सदस्यांनी घेतल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी सभागृहात गोंधळ होऊन दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब झाले.

सभागृहातील कामकाजपत्रिकेवरील कालच्या कार्यक्रमातील लक्षवेधी सूचना आज पुकारण्यात आल्या. लक्षवेधी सूचना झाल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासाऐवजी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांची चौकशी जाहीर करावी, या मागणीसाठी विधान परिषदेतील विरोधकांनी दोन वेळा कामकाज रोखून धरले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर या प्रश्नावर विरोधकांच्या घोषणा व आक्रमक पवित्रा पाहता तिसऱ्यावेळी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

चौकशीला घाबरता का?

सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर या प्रश्नावर विरोधक ठाम असून, सरकारने विद्यमान न्यायमूर्तींमार्फत आरोप झालेल्या सर्व मंत्र्यांची चौकशी जाहीर केली पाहिजे, असे मुंडे यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले. नियम २६० अन्वये विधानपरिषदेत विरोधकांनी भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या मंत्र्यांबद्दल पुराव्यानिशी माहिती सभागृहात सादर केली. तथापि, त्या आरोपांची चौकशी होण्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत त्या सर्व वादग्रस्त मंत्र्यांना क्लीन चिट दिली. विधानपरिषदेच्या सभागृहात सोमवारी संबंधित मंत्र्यांनी आरोपांना उत्तर देताना आपण किती स्वच्छ आहोत, प्रामाणिकपणाने काम करत असल्याचा त्या मंत्र्यांचा दावा होता. यावर आमचे इतकेच म्हणणे आहे की तुम्ही इतके साफ आहात तर आम्ही जे पुरावे मांडले, त्याची आपण सखोल चौकशी केली पाहिजे. चौकशीला सामोरे जाण्यास ते मंत्री कशासाठी​ घाबरतात, असा सवाल मुंडे यांनी केला. एकनाथ खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्याचा राजीनामा त्यांच्यावरील आरोपांमुळे घेण्यात आला. दुसरीकडे खडसे यांच्यापेक्षा गंभीर आरोप असलेल्या मंत्र्यांना क्लीन चिट दिली जाते. ‘सैंय्या भये कोतवाल ,अब डर काहेका, डालो डाके,’ अशी काही मंत्र्याची मानसिकता झाल्याचा गंभीर आरोपही मुंडे यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज