- ८० टक्के रिक्षा-टॅक्सी चालक संकटात
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
करोनामुळे जनजीवनावर विस्कळीत होत असताना त्याचा सर्वाधिक फटका हातावर पोट भरणाऱ्या सामान्य मुंबईकरांना बसत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर प्रवासीच नसल्याने टॅक्सी-रिक्षा चालकांचा रोजगार पूर्णपणे बुडाला आहे. त्यामुळे रोजच्या जेवणापासून ते घराच्या हफ्त्यांपर्यंत अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागणारे आहे.
घरातून काम करण्यास परवानगी दिल्याने अनेक कार्यालये ओस पडली आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहने कमी झाली आहेत. त्याची सर्वाधिक झळ टॅक्सी चालकांसारख्या 'हातावर पोट' असणाऱ्यांना बसत आहे, असे वांद्रे येथील टॅक्सीचालक मुश्ताक खान याने सांगितले. तर सध्याच्या जेमतेम कमाईत घरखर्च, औषधखर्च, घर-गाडीचा हफ्ता कसे भरणार, असे प्रश्न भेडसावत आहे. ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास पुन्हा गावी जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही, अशी प्रतिक्रिया मुलुंड येथे राहणाऱ्या रिक्षाचालक समीर चव्हाण याने दिली.
मुंबईतील रिक्षाा-टॅक्सीपैकी केवळ २० टक्के स्थानिक आहेत. तर ८० टक्के चालक हे राज्यातील विविध भागांतील आहेत. अनेक जण भाड्यावर टॅक्सी-रिक्षा चालवतात. मात्र सध्या उत्पन्नच नसल्याने भाडे देण्यापासून ते हफ्ते फेडण्यापर्यंत विविध अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे,
-मुंबई टॅक्सी-मेन्स युनियनचे जनरल सेक्रेटरी ए.एल. क्वाड्रोस
परिवहन मंत्र्यांना भेटणार
खटुआ समितीच्या अटी आणि आता रोडावलेल्या प्रवासी संख्येमुळे रिक्षा-टॅक्सी चालकांचे जगणे अतिशय कठीण झाले आहे. यामुळे रिक्षा-टॅक्सी कंपनी आणि अॅप बेस्ड कंपनी यासाठी एकच दर असावा, मुंबईसह राज्यातील रिक्षाचालकांसाठी महामंडळ स्थापन करावे, या मागण्यांसाठी परिवहनमंत्री अनिल परब यांची भेट घेणार असल्याचे कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले.