अ‍ॅपशहर

आघाडीत वादाची ठिणगी; औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यांवरुन मुख्यमंत्री राजीनामा देणार?

शिवसेनेतील बंडाळीनंतरही एकजूट राखत आघाडी टिकवून असलेल्या राज्य सरकारमधील पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 29 Jun 2022, 7:00 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः शिवसेनेतील बंडाळीनंतरही एकजूट राखत आघाडी टिकवून असलेल्या राज्य सरकारमधील पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करावे, असा प्रस्ताव आज, बुधवारी मंत्रीमंडळ बैठकीसमोर येणार असून त्याला काँग्रेस पक्ष विरोध करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. तसे झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारीच या मुद्द्यावरून राजीनामा देण्याची शक्यता असल्याची चर्चा महाविकास आघाडीतील वरिष्ठ वर्तुळात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cm-live


परिवहनमंत्री अनिल परब यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला असता बुधवारी यासाठी पुन्हा मंत्रीमंडळ बैठक बोलावण्याचे निर्देश देण्यात आले. यानंतर या मुद्द्यावरून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिल्लीतील हायकमांडशी चर्चा केली. यात या नामांतराला पक्षाने विरोध करावा, असे निर्देश त्यांना देण्यात आल्याचे समजते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, यामागे मोठी राजकीय रणनीती असून काँग्रेस पक्षाशी मतभेद झाल्याचे दाखवत ठाकरे आपल्या पक्षातील आमदारांसोबत एकत्र येण्याचीही शक्यता आहे. तसे झाल्यास राज्यात पुन्हा युतीचे सरकार सत्तेवर येईल व देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील. तर उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुखाच्या भूमिकेत दिसतील, अशी चर्चा महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये रात्रीपासून सुरू झाली आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न राजकीय अजेंड्याचा मुद्दा ठरला होता. विरोधकांसह अनेक राजकीय पक्षांनी या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांपूर्वीच झालेल्या शिवसेनेच्या सभेतही यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले होते. त्यानंतर आता सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि एकनाथ शिंदे गटाच्या बंडाला सडेतोड उत्तर देण्यासाठी शिवसेनेने ही अचूक वेळ साधली. मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत यासंदर्भातील सूचना शिवसेनेचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली. त्यानंतर तातडीने सूत्रे हालविण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव बुधवारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्यासंदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

वाचाः सत्ताबदलाच्या हालचालींना वेग! बहुमत चाचणीची भाजपची मागणी, बंडखोर आमदार मुंबईत येणार?

महत्वाचे लेख