म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असल्याने आर्थिक आघाडीवर काळजी करण्यासारखी स्थिती नाही, असे केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शनिवारी सांगितले. कामगार भविष्य निर्वाह निधीतील खात्यांचा हवाला देत त्यांनी देशात रोजगार वाढत असल्याचा दावा केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविशंकर प्रसाद यांनी भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. आर्थिक मंदीच्या संकटाचा देशावर परिणाम होणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशात यावर्षी १६.३ अब्ज डॉलर एवढी थेट विदेशी गुंतवणूक झाली. गेल्या वर्षीपेक्षा थेट विदेशी गुंतवणुकीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. करदात्यांच्या संख्येत गेल्या पाच वर्षांत दुप्पट वाढ झाली असून कर संकलनातही वाढ झाली आहे. जागतिक मंदीतही देशाची अर्थव्यवस्था सहा टक्क्यांपेक्षा अधिक गतीने वाढत आहे. गेल्या दोन वर्षात कामगार भविष्य निर्वाह निधी खात्यात अडीच कोटींनी वाढ झाली, असे ते म्हणाले.