म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
'महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणामध्ये जिल्हा पातळीवर छोटेखानी सुसज्ज १५० आसनी नाट्यगृहाचा मुद्दा मांडण्यात आला होता. जिल्हा पातळीवर अजूनही ते झाले नाही, मात्र नाट्यसंमेलनाध्यक्ष असताना महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये किमान असे नाट्यगृह हवे असे सुचविले होते. अखेर वयाच्या ८८व्या वर्षी हे स्वप्न साकार होत आहे', असे सांगत ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांनी पु. ल. देशपांडे कला अकादमी येथील प्रायोगिक रंगमंच निर्मिती प्रक्रियेला शुभेच्छा दिल्या. शुक्रवारी या रंगमंच निर्मितीचा विधिवत पूजेने आरंभ झाला.
पु. ल. कला अकादमीच्या इमारतीची निर्मिती झाल्यापासून प्रायोगिक रंगभूमीचा प्रस्ताव होता. त्यासाठी प्रायोगिक नाट्यगृहाचे बांधकामही सुरू झाले. मात्र सन २०११नंतर ते रखडले. यामध्ये वास्तुविशारद आणि सरकारमधील वाद, सरकारकडे मूळ कागदपत्र नसणे, आधीच्या वास्तुविशारदाचे ना हरकत प्रमाणपत्र अशा अनेक गोष्टींचा अडसर ठरला. त्याला विधानसभा निवडणुकीआधी मुहूर्त लाभला आहे. हे नाट्यगृह येत्या जानेवारीपासून सुरू होईल, असे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी दिले. यामध्ये खुर्च्यांची व्यवस्था मागे घेण्याजोगी असणार असून एखाद्या नाटकासाठी रंगमंचाचा अधिक भाग वापरायची वेळ आल्यास तशी सोय करता येईल. पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर या नाट्यगृहामध्ये नेपथ्याचे सामान कसे नेणार या प्रश्नासंदर्भात, बाहेरून लिफ्टची सोय करण्यात येईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले. तसेच या नाट्यगृहामधील सोयी पाहण्यासाठी रंगकर्मींची समिती स्थापन करण्यात आली असून, त्यांच्या सल्ल्याने हे काम पूर्ण होईल असेही ते म्हणाले. प्रायोगिक रंगभूमीवरील कलाकारांना परवडणाऱ्या दरामध्ये हे नाट्यगृह उपलब्ध होणार असून, वर्षभरात २०० प्रयोग मराठी प्रायोगिक रंगभूमीवरील कलाकार करतील, असेही ते म्हणाले.
यावेळी भूषण गगराणी, ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, ज्येष्ठ रंगकर्मी मीना नाईक उपस्थित होते. या नाट्यगृहाची पाहणी केल्यानंतर मीना नाईक यांनी, 'मेकअप रूमचा आकार, मेकअप रूमकडे जाणाऱ्या गोलाकार पायऱ्या या अडचणीच्या ठरतील, असे सांगितले. तसेच 'या रंगमंचाची रचना चारही बाजूने प्रेक्षकांना बसता येईल, अशी हवी होती तसेच रंगमंचाला चौकटी नसत्या तर अधिक चांगले झाले असते', असे त्या म्हणाल्या.
नाट्यगृहांसाठी तरतूद हवीच
'तरुण कलाकारांनाकडून चांगल्या कलेच्या अपेक्षा असतील तर त्याला साजेशा पायाभूत सुविधांची गरज आहे. नाट्यगृहे स्वबळावर चालतील, असे गृहित धरता येणार नाही. त्यासाठी महापालिका आणि सरकारला अर्थसंकल्पात तरतूद करावी लागेल, अशी भूमिका भूमिका तावडे यांनी मांडली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करण्यात आले असून, जिल्हा पातळीवरही नाट्यगृहांचा प्रश्न येत्या काळात मार्गी लागेल, अशी आशा प्रसाद कांबळी यांनी व्यक्त केली.