म. टा. प्रतिनिधी, मुंबई
कोल्हापूर, सांगली पट्ट्यात आलेल्या महापुरात अडकलेल्या लोकांना इतर सोयीसुविधांसोबत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईलाही सामोरे जावे लागत आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाने पुढाकार घेतला आहे. तातडीने बैठक घेऊन १०० ट्रक भरून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या पूरग्रस्त भागात पाठवण्याचा निर्णय न्यासाने घेतला असून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मंजुरी दिली आहे.
पूरग्रस्त भागात पिण्याचे शुद्ध पाणी तातडीने पोहोचवणे खूप आवश्यक आहे. त्यादृष्टीने आम्ही तातडीने बैठक घेऊन निर्णय घेतला आहे. अंदाजे ११ लाख लिटर पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तातडीने पूरग्रस्त भागात रवाना करण्यात येतील. सांगली आणि कोल्हापूरच्या जिल्ह्याधिकाराऱ्यांच्या समन्वयातून याचे वाटप केले जाईल, अशी माहिती श्री सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.