अ‍ॅपशहर

वाढत्या प्रदूषणामुळे दमा वाढतोय

अस्थमा (दमा) हा मुळात आजार नाही. तो कधीही होऊ शकतो. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तो कसाही होऊ शकतो. आपली श्वासनलिका बारीक झाल्याने हा त्रास जाणवतो. पण गेल्या काही वर्षांपासून वाढत असलेल्या वायू प्रदूषणामुळे हा प्रकार वाढत असल्याची खंत ज्येष्ठ चेस्ट स्पेशलिस्ट डॉ. सलील बेंद्रे यांनी मुंबईत व्यक्त केली.

Maharashtra Times 18 Feb 2018, 2:00 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: अस्थमा (दमा) हा मुळात आजार नाही. तो कधीही होऊ शकतो. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तो कसाही होऊ शकतो. आपली श्वासनलिका बारीक झाल्याने हा त्रास जाणवतो. पण गेल्या काही वर्षांपासून वाढत असलेल्या वायू प्रदूषणामुळे हा प्रकार वाढत असल्याची खंत ज्येष्ठ चेस्ट स्पेशलिस्ट डॉ. सलील बेंद्रे यांनी मुंबईत व्यक्त केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम due to increasing pollution asthma is increasing
वाढत्या प्रदूषणामुळे दमा वाढतोय


रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वरतर्फे विलेपार्ले येथील डॉ. हेडगेवार मैदानात संवाद डॉक्टरांशी या आरोग्यविषयक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' या व्याख्यानमालेचा मीडिया पार्टनर आहे. या व्याख्यानमालेअंतर्गत गुरुवारी प्रदूषण आणि फुफ्फुसाचे आजार या विषयावर डॉ. बेंद्रे यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली. सध्या शहरात प्रदूषण वाढत असल्याने हा त्रास जाणवत असला तरी त्यास आपली बदलती जीवनशैलीदेखील कारणीभूत ठरत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विशेष म्हणजे, आपल्याला दमा झालाय, हे सहजासहजी स्वीकारण्यास लोक तयार होत नसल्याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

दम्यावरील उपचाराविषयी बोलताना डॉ. बेंद्रे म्हणाले की, दमा झाला म्हणजे आता पंप सुरू झाला, आता इन्हेलर कायम सुरू राहणार असा गैरसमज लोकांमध्ये निर्माण झाला आहे. मुळात अनेकांचा पंप आणि इन्हेलर शरीरासाठी घातक असल्याचे अनेकांना वाटते. त्यामुळे अनेकदा गोळ्यांना अधिक पसंती दर्शवली जाते. प्रत्यक्षात याउलट परिस्थिती आहे. दम्यावरील गोळ्यांमुळे शरीराच्या इतर अवयवांना धोका पोहोचण्याचा संभव जास्त असतो. पंप वापरल्याने औषध थेट फुफ्फुसापर्यंत पोहचते. त्यामुळे लोकांनी याचा योग्य तो विचार करावा, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. इन्हेलर सुरू केल्यानंतर त्यात खंड पडू नये, तो मध्येच बंद केल्यास दमा प्रखरतेने वाढू शकतो. ३० टक्के खोकला हा अॅसिडिटी आणि पित्ताच्या त्रासामुळे होत असतो. त्यामुळे या गोष्टींवर लक्ष ठेवण्याची गरजही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

आजीचा बटवा उपयोगीच

सध्याचे वाढते प्रदूषण, वातावरणातील बदल यामुळे सर्दी, खोकला आणि कफचा त्रास वाढतो. यासाठी प्रत्येकवेळी औषधे न घेता घरगुती उपायांना विशेष प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत डॉ. बेंद्रे यांनी व्यक्त केले. यासाठी नियमित गरम पाण्याची वाफ घेतल्यास, त्याचबरोबर गरम पाण्याने गुळण्या केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. अशा आजीच्या बटव्यातील अनेक उपायांकडे त्यांनी लक्ष वेधले. तिखट आणि तेलकट खाणे टाळावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

एअर प्युरिफायरबद्दल साशंकता

सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात हवा शुद्ध करण्यासाठी एअर प्युरिफायर उपलब्ध आहेत. ते या आजारासाठी उपयुक्त ठरतात का हे अजून सांगणे कठीण असल्याचे मत डॉ. बेंद्रे यांनी व्यक्त केले. पण हे आपल्या शरीरासाठी अपायकारक नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

घरातील प्रदूषणावर नियत्रण हवे

सध्या आपण घराबाहेरील प्रदूषणाबाबत बरीच चर्चा करतो. पण घरात होणाऱ्या प्रदूषणाकडे मात्र आपले दुर्लक्ष होते. याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करताना ते म्हणाले, 'सॉफ्ट टॉइज, कारपेट्स, सोफा कव्हर यातून मोठ्या प्रमाणात विषाणू श्वासामार्फत शरीरात पोहोचतात. त्यामुळे या वस्तू टाळाव्यात.' मुंबई शहरात सध्या वाढत्या कबूतरांमुळे दम्याचा त्रास बळावत असल्याचा धोका त्यांनी बोलून दाखविला.

धूम्रपान आणि शीतपेय घातक

बदलत्या जीवनशैलीचा फटका कसा बसत आहे हे अधोरेखित करताना डॉ. बेंद्रे यांनी धूम्रपानाच्या व्यसनामुळे दम्याचा त्रास जास्त होत असल्याचे सांगितले. शीतपेयांमुळेदेखील अधिका धोका असल्याने त्याने त्रास बळावू शकतो, असेही ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज