म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
पूर्व उपगनरांमधील खारफुटीसंदर्भात मुख्य मुद्दा चर्चेत येतो, तो डम्पिंग ग्राऊंडचा. पूर्व उपनगरांमध्ये वनक्षेत्रातील जमीन प्रामुख्याने असल्याने या भागात पश्चिम उपगनरांप्रमाणे खारफुटीची नासधूस होत नाही. मात्र इथे डम्पिंग ग्राऊंडनेच खारफुटीचा बळी घेतला आहे. आगामी ऐरोलीचे डम्पिंग ग्राऊंडही खारफुटीवरच आहे.
ठाण्याच्या कोपरीचे डम्पिंग ग्राऊंडचा डोंगर ऐरोली खाडीपुलावरून दिसतो. याच पुलावरून आभाळात झेपावणारा फ्लेमिंगोंचा थवाही दिसतो. कांजूरमार्ग आणि देवनारच्या डम्पिंग ग्राऊंडहीच्या जन्माची कथाही खारफुटीपासूनच सुरू होते. कांजूरमार्ग यथील डम्पिंग ग्राऊंड हे सर्वात मोठे असून ते सुमारे १२० हेक्टर जमिनीवर वसलेले आहे. आता चौथेही आगामी डम्पिंग ग्राऊंडही खारफुटीची कत्तल करूनच तयार होणार आहे. ऐरोली येथे या डम्पिंग ग्राऊंडला परवानगी मिळाली आहे. येथील खाडीला फ्लेमिंग अभयारण्याचा दर्जा मिळाला आहे. तरीही इथे कचरा आणण्याचा अट्टाहास कायम आहे, असे वनशक्तीचे संचालक डी. स्टॅलिन स्पष्ट यांनी स्पष्ट केले.
कोपरीचे डम्पिंग ग्राऊंड बंद झाले तरी स्थानिकांसाठी त्याचे पडसाद उमटणे बंद झालेले नाही. या खाडी आणि खारफुटीमध्ये पूर्वी अनेक मासे मिळायचे. कोपरी हा भाग भौगोलिकदृष्ट्या ठाण्यात असला तरी दोन्ही बाजूला राहणाऱ्या मच्छिमारांसाठी ही खाडी वरदान होते. इथे मोठ्या कोळंब्यांपासून मासे मिळायचे. मात्र आता इथे केवळ कचरा दिसतो. या खाड्यांमध्ये चालणारी मच्छिमारी केव्हाच बंद झाली आहे, अशी तक्रार श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे प्रमुख नंदकुमार पवार यांनी केली. कांजूरच्या डम्पिंग ग्राऊंडमुळेही हीच अवस्था आहे. खाडीमुखाशी सगळा कचरा साचून राहतो. त्यामुळे पावसाळ्यात पाणी वाहून जायला जागा उरलेली नाही. भांडुप, कांजूर येथील स्थानिकांनी भांडून, लढा देऊन कांजूरच्या डम्पिंग ग्राऊंडवर येणाऱ्या कचऱ्याचे विभाजन करून तिथे विविध प्रकल्प सुरू करायला लावले. मात्र या खाडीचे झालेले नुकसान अपरिमित आहे असे पवार यांनी स्पष्ट केले. कांजूर येथे हायवेखालून खाडीचे पाणी खारफुटीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड जिथे पूर्व द्रुतगती मार्गाला जोडला जातो तिथे असलेली खारफुटी नष्ट झाली होती. मात्र रस्त्याखालून येणारे पाण्याचे मार्ग खुले झाल्याने आता या परिसरात नवी खारफुटी यायला सुरुवात झाली आहे. मात्र यासाठीही खूप प्रयत्न करायला लागल्याचे पवार यांनी सांगितले.
भांडुप पम्पिंग ग्राऊंड येथे फिरताना या डम्पिंग ग्राऊंडचे आणि माणसाने केलेल्या कचऱ्याचे परिणाम दिसतात. भांडुप पम्पिंग स्टेशन येथे एका बाजूला स्वच्छ तलाव दिसतो तर दुसऱ्या बाजूला मात्र खाडीचे काळे पाणी दिसत राहते. खारफुटीमध्ये पसरलेल्या गाळामध्ये चपला, बुटांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसते. हा कचरा विघटनशील नाही. खाडीच्या पाण्यावर प्लास्टिकचा पसरलेला गाळ दिसतो. वर्षातून एक दिवस इथे स्वच्छता केली जाते. माणसाने विविध मार्गाने समुद्रात कचरा ढकलून दिला आहे. हा कचरा खाडीमुखाशी साचून राहतोच, मात्र खारफुटी ज्या पद्धतीने नष्ट होत आहे, सीआरझेड क्षेत्रावर अतिक्रमण होत आहे, ते पाहता पुराच्या वेळी हा सगळा कचरा शहरात साचून राहील, असा इशारा देण्यात येतो.