अ‍ॅपशहर

मराठीच्या ई व्यासपीठाची चढती कमान

आजच्या लेखकांना आणि प्रकाशकांनाही ई-व्यासपीठाकडून मोठ्या आशा आहेत.

Maharashtra Times 15 Oct 2017, 4:07 am
ई बुक्स डाऊनलोड करण्याचा वाढता ओढा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम e books in marathi in good demand
मराठीच्या ई व्यासपीठाची चढती कमान


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

डिजिटल प्लॅटफॉर्मवरील व्यक्त होण्याचे प्रमाण गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. केवळ ब्लॉगपासून सुरू झालेला प्रवास समाजमाध्यमांमधून लहान-लहान स्फुटांच्या माध्यमातून व्यक्त होण्यापर्यंत अधिक वेगाने पोहोचला आहे. सोप्या आणि सहज व्यासपीठामुळे लिहिण्यासाठी अनेकांना प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळेच आजच्या लेखकांना आणि प्रकाशकांनाही ई-व्यासपीठाकडून मोठ्या आशा आहेत. हेच उद्याचे व्यासपीठ आहे, हा विश्वास आजच्या पिढीतील लेखक, प्रकाशक आणि संपादक व्यक्त करतात.

ई-बुक्सच्या माध्यमातून मराठीतील अनेक प्रकाशकांनी या वर्षभरात पु.ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, जी.ए. कुलकर्णी, शांता शेळके, ना. धों. महानोर यांच्यापासून अनेक लेखकांची पुस्तके वाचकांना उपलब्ध करून दिली आहेत. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अजूनही पुस्तकांची दुकाने उपलब्ध नाहीत. मात्र राज्यातील दुर्गम भागांमध्येही स्मार्ट फोन आणि इंटरनेट पोहोचले आहे. अॅमेझॉन, डेली हंट, मराठी रीडर यासारख्या माध्यमांमधून मराठी पुस्तके डाऊनलोड होण्याचे प्रमाण वाढत आहे. अर्थात या माध्यमाला प्रत्यक्ष पुस्तकांइतकी लोकप्रियता मिळाली नसली तरी बसल्या ठिकाणी ही पुस्तके उपलब्ध होत असल्याने तरुण वर्गामध्ये याचे आकर्षण आहे. मराठी रीडर अॅपचे अनावरण झाल्यानंतर पहिल्या महिन्यातच त्यास प्रचंड प्रतिसाद लाभला. अनेक पुस्तकेही डाऊनलोड करण्यात आली. मात्र सध्या तरी या अॅपवर मर्यादित पुस्तके असल्याने आणि हे व्यासपीठ अॅपल प्रणालीवर उपलब्ध नसल्याने वाचकांना ई-बुक्समध्ये आणखी पर्याय उपलब्ध होण्याची प्रतीक्षा आहे.

तांत्रिक सोयीमुळे ई बुक्सला पसंती

चित्रांमधील मजा, रंग, प्रत्यक्ष पुस्तकाचा अनुभव या गोष्टी ई-बुक पर्यायामध्ये उपलब्ध नसल्या तरी वाचकाच्या गरजेनुसार फॉण्टचा आकार बदलण्याची सोय, हायलाइटची सोय आणि सतत हातात असलेल्या गॅजेटवर पुस्तक मिळत असल्याने या पुस्तकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होत आहे. दिवाळी अंकांमध्येही मिसळपाव, रेषेवरची अक्षरे, डिजिटल दिवाळी, ऐसी अक्षरे यांना मिळणाऱ्या वाचकवर्गाचे प्रमाण वाढत आहे. रेषेवरची अक्षरे संपादक मंडळातील सदस्या मेघना भुस्कुटे यांनी ई साहित्य हेच भविष्यातील माध्यम असल्याचे स्पष्ट केले. सन २००८-०९ सालापर्यंत डिजिटल लेखन हे ब्लॉगपुरते मर्यादित होते, असे सांगितले. त्यावेळी मोठ्या प्रमाणात परदेशातील वाचकवर्ग डिजिटल साहित्याचे वाचन करायचा. मात्र आता फेसबुकसारख्या माध्यमातून हे लेखन अधिक व्यापक वाचकवर्गापर्यंत पोहोचले आहे. या माध्यमातून नवीन लेखकांचीही निर्मिती होत आहे. बुक हंगामा, नुक्कड कथा, ई-साहित्य प्रतिष्ठान या माध्यमांनी युवा लेखकांना लिहिण्यासाठी प्रोत्साहन आणि लिहिण्याचा आत्मविश्वास मिळवून दिला आहे. आपल्या डायरीपुरते लिहिणाऱ्या अनेक नवोदित लेखकांना या डिजिटल माध्यमांनी व्यासपीठ मिळवून दिले. केवळ व्यक्त होण्यासाठी व्यासपीठच नाही तर या माध्यमातून प्रत्यक्ष न भेटता साहित्यावर चर्चा होत असल्याने आणि तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळत असल्याने लेखकांना लेखनाचा दर्जा सुधारायलाही मदत होत आहे. या चर्चांमधून वाचकांचे जाळेही विस्तारत आहे. त्यामुळे ई बुक्स माध्यम हे केवळ नामवंत आणि नवोदित लेखकांच्या पुस्तकांना रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच नाही तर नवोदित वाचकांसाठीही महत्त्वाचे ठरत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज