म. टा. प्रतिनिधी, मुंबई
मुंबई आणि ठाणे परिसरातील कांदळवन क्षेत्रात २५ हजार लोकांच्या सहभागातून आठ हजार टन कचऱ्याचे संकलित करण्यात आला आहे. त्यामुळे ११.०३ किमीचा खाडीकिनारा स्वच्छ झाला आहे. शहरी वनक्षेत्र स्वच्छतेचे भारतातील सर्वात मोठे अभियान लोकसहभागातून यशस्वी झाल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
या अभियानाला लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे. कांदळवन क्षेत्र हे समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील जैवविविधतेचे भंडार समजले जाते. मत्स्यबीज तयार होण्याचा हा उगमस्त्रोत आहे. त्याचबरोबर सुनामी आणि चक्रीवादळापासून खाडी किनाऱ्यावरील लोकांचे संरक्षण करण्यामध्ये हे क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावते. कांदळवनात सागरी जीवांचे चिरकाळ संवर्धन होते. कांदळवनाची कर्ब आम्ल शोषून घेण्याची क्षमता मोठी असल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये या वनांचे मोठे योगदान आहे, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
मुंबई हे जगातील मोठे कांदळवनक्षेत्र असणारे शहर आहे. प्लास्टिकमुळे कांदळवनाचा होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी वन विभागाने हे स्वच्छता अभियान हाती घेतले होते. याची सुरुवात मार्च २०१५ मध्ये सुरू झाली. या अभियानांतर्गत मुंबई, नवी मुंबई, बांद्रा, वर्सोवा, दहिसर, शिवडी, ऐरोली, भांडूप, गोराई, वाशी येथील कांदळवनांची स्वच्छता करण्यात आली.
क्षेत्र वाढले
राज्य शासनाने स्वतंत्र कांदळवन कक्षाची निर्मिती केली आहे. या कक्षामार्फत सागरतटीय क्षेत्रातील या वनांच्या संवर्धन, संरक्षणाबरोबर कांदळवन उपजीविका योजनाही राबविली जाते. या अभियानात शिंपले, मासे, कालवे पालन, खेकड्यांची शेती अशा विविध पद्धतीने उपजीविकेची साधने विकसित करण्यात येत आहेत. महिला बचतगटांना यात सहभागी करून घेतले जात आहे. भारतीय वन सर्वेक्षण अहवालानुसार राज्यातील कांदळवन क्षेत्रात ८२ चौ. किमीची वाढ झाली असून देशात महाराष्ट्र यात अग्रस्थानी असल्याची माहिती वनमंत्र्यांनी दिली आहे.