मुंबई : मुंबई मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडांच्या कत्तलीनंतर वादग्रस्त ठरलेल्या मुंबई मेट्रो रेल्वेच्या तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडे यांची उद्धव ठाकरेंनी सत्तेत येताच उचलबांगडी केली होती. आता नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने मात्र मेट्रोपेक्षा सुपरफास्ट निर्णय घेत अश्विनी भिडे यांच्यावर पुन्हा मुंबई मेट्रोची धुरा सोपवली आहे. ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानण्यात येतोय.
अश्विनी भिडे १९९५ च्या बॅचच्या आएएस अधिकारी आहेत. कार्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांना ओळखलं जातं. देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं गेलं जेव्हा त्यांनी रातोरात आरे कॉलनीतील झाडांची कत्तल केली. कारशेडच्या मुद्द्यावरुन ठाकरे आणि अश्विनी भिडे यांच्यात मतभेद झाले होते. त्यानंतर त्यांना करोना विषाणू व्यवस्थापन समितीत सहभागी करुन घेण्यात आलं. तसेच नंतर २०२० साली त्यांना मुंबई महापालिकेचं अतिरिक्त आयुक्तपद देण्यात आलं होतं. आता फडणवीसांनी सत्तेत येताच अश्विनी भिडे यांच्यावर पुन्हा मुंबई मेट्रोची जबाबदारी देऊन शिवसेनेला धक्का दिला आहे.