अ‍ॅपशहर

एल्फिन्स्टन, करीरोड पूल २० फेब्रुवारीपर्यंत पूर्णत्वास

लष्करातर्फे हाती घेण्यात आलेला एल्फिन्स्टन-परळ जोडपूल तसेच आंबिवली येथील पादचारी पूल २० फेब्रुवारीपर्यंत सेवेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधी १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व कामे पूर्णत्वास येतील, असे सांगितले जात होते.

Maharashtra Times 15 Feb 2018, 4:35 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bridge


लष्करातर्फे हाती घेण्यात आलेला एल्फिन्स्टन-परळ जोडपूल तसेच आंबिवली येथील पादचारी पूल २० फेब्रुवारीपर्यंत सेवेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधी १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व कामे पूर्णत्वास येतील, असे सांगितले जात होते.

पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन रोड पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वे मंत्रालयाने जोडपूल, करीरोड व आंबिवली येथील तीन पादचारी पुलांचे काम लष्कराकडे सोपवले. हे तिन्ही पूल ३० जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याची घोषणा करण्यात आली होती. पण तांत्रिक अडचणींमुळे त्यात अडथळे येत गेल्याने त्यास विलंब झाला. जोडपूल, आंबिवली, करीरोड पुलाच्या उभारणीसाठी शेवटचा हात फिरवणे सुरू आहे. जोडपुलासाठी २७-२८ जानेवारी आणि करीरोड पुलासाठी ४ फेब्रुवारी रोजी पुलाचे गर्डर यशस्वीपणे उभारण्यात आले.

या दोन्ही पुलांचे काम अंतिम टप्प्यात आले असून ते २० फेब्रुवारीपर्यंत सुरू होणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. जोडपुलाकडे परळ स्थानकाकडे पायऱ्या जोडण्यासाठीचे काही काम शिल्लक राहिले आहे. ते काम संपुष्टात आल्यानंतर पुलाचे काम पूर्णत्वास येणार आहे.

करीरोड येथील पुलाचे काम ३० जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. पण, करीरोड स्थानकाकडे पायऱ्यांसाठी जागा उपलब्ध नव्हती. तेव्हा मध्य रेल्वेने तिथली खासगी जमीन ५ कोटी रुपये मोजून विकत घेतली. त्यानंतर या कामास सुरुवात झाली. जोडपुलाकडे सुरुवातीच्या आरेखनात बदल करावा लागल्याने काही आठवड्यांचा उशीर झाला. त्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामाने वेग घेतला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज