राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे निर्देश
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील वैधानिक विकास मंडळांनी अधिक सक्षमपणे काम करण्याची गरज असून त्यासाठी या मंडळांना आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी संबंधितांना दिले आहेत. वैधानिक मंडळांना मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन विभागाने कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, असेही राज्यपालांनी आवर्जून नमूद केले. विदर्भ व मराठवाड्यात शेती, सिंचन, आरोग्य आणि शिक्षण यावर मंडळांनी अधिक लक्ष केंद्रीत करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ यांची संयुक्त बैठक राजभवनामध्ये सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्यावेळी राज्यपालांनी हे निर्देश दिले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्यासह विकास मंडळांचे अध्यक्ष, सचिव, सदस्य यावेळी उपस्थित होते.
वैधानिक विकास मंडळांनी कार्यक्षमता वाढवून कालबद्ध पद्धतीने तीनही विभागांचा अधिक विकास करावा. काही भागात अनुशेष दूर करण्यासाठी निधीचे समान वाटपाचे जे सूत्र आहे, ते बदलण्याची गरज आहे. विभागनिहाय निधी वाटपासाठी आवश्यक सुधारणा नियोजन विभागाने तीन महिन्यांत कराव्यात, विकास मंडळांना मनुष्यबळ देण्यासाठी नियोजन विभागाने प्रक्रिया हाती घ्यावी, असे राज्यपालांनी सांगितले. केंद्र व राज्याचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी मंडळांनी अधिक भर द्यावा, आदिवासी मुले शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्यपालांनी केले.
आरोग्य, शिक्षण, कृषी विकासाकडे लक्ष द्यावे
विदर्भ, मराठवाडा भागातील सिंचन, आरोग्य, शिक्षण, कृषी या क्षेत्रातील विकासासाठी तीनही विकास मंडळांनी विशेष लक्ष केंद्रीत करून काम करण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तीनही विकास मंडळांनी केलेल्या सूचनांच्या अभ्यास व समन्वयासाठी एक समिती आवश्यक आहे. गडचिरोली भागातील मलेरियाचा प्रादूर्भाव, आदिवासी भागातील कुपोषणावर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि त्याच्या समूळ उच्चाटनासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.