अ‍ॅपशहर

भावी काळासाठी योग्यच घटना

युरोपीय समुदायातून ब्रिटनने बाहेर पडायचे की नाही, हे ठरवण्यासाठी सार्वमत घेण्यात आले आणि ब्रिटनच्या जनतेत गोंधळाचे वातावरण असल्याचे स्पष्ट झाले.

Maharashtra Times 25 Jun 2016, 4:11 am
vaibhav.vaze@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम eu referendum why brexit is a good idea
भावी काळासाठी योग्यच घटना


मुंबई ः युरोपीय समुदायातून ब्रिटनने बाहेर पडायचे की नाही, हे ठरवण्यासाठी सार्वमत घेण्यात आले आणि ब्रिटनच्या जनतेत गोंधळाचे वातावरण असल्याचे स्पष्ट झाले. सार्वमतानंतर आता ब्रिटनने युरोपीय समुदायातून बाहेर पडायचा निर्णय घेतला आहे. या घटनेमुळे काहीशी घबराट पसरली असली तरी, भावी काळासाठी ही घटना योग्य असल्याचे मत लंडन येथील रहिवासी असलेल्या मानसी लोवलेकर यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या खास मुलाखतीत शुक्रवारी सांगितले.

मूळ मुंबईच्या मानसी लोवलेकर गेल्या सोळा वर्षांपासून लंडनच्या रहिवासी आहेत. ईएआय सिस्टिम्स लिमिटेड या स्वतःच्या कंपनीत त्या कंपनी सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत. ब्रेक्झिटसाठी आता कुठे सार्वमत घेण्यात आले आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, 'ही सगळी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी तब्बल अडीच ते तीन वर्षे लागणार आहेत. भारतीयांच्या दृष्टीने विचार केल्यास कुशल भारतीयांना यामुळे फारसा फरक पडणार नाही. याचे कारण कुशल मनुष्यबळासाठी ब्रिटनमध्ये कोटा आहे. उलट, युरोपीय समुदायातून बाहेर पडल्यानंतर नोकऱ्या निर्माण होतील'.

'युरोपीय समुदायातून बाहेर पडावे की नाही याविषयीची चर्चा इंग्लंडमध्ये गेल्या ८-१० वर्षांपासून सुरू आहे. अन्य युरोपीय देशांतून मोठ्या प्रमाणावर लोक ब्रिटनमध्ये स्थलांतरित होत होते. त्यांचा प्रश्न उग्र बनत चालला होता. त्यांच्यामुळे स्वस्त दरात मनुष्यबळ उपलब्ध होत असले तरी, सामाजिक दर्जा घसरत होता. या स्वस्त मनुष्यबळाने ब्रिटनमधले जॉब मार्केट अक्षरशः काबीज केले होते. त्यामुळे मूळ ब्रिटिश नागरिकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत होता. याचा परिणाम म्हणून ब्रिटिश समाजात गरीबी वाढत होती. हे सारे आता ब्रिटनला टाळता येणार आहे. मात्र याचा मोठा फटका स्थावर मालमत्ता क्षेत्राला बसू शकतो', याकडेही मानसी लोवलेकर यांनी लक्ष वेधले.

कारखानदारीला फटका?

वाहन उद्योग, विमान उद्योगातील बोइंगसारख्या कंपन्या यांना कदाचित नोकरकपात करावी लागण्याची शक्यता आहे. युरोपीय समुदायातील देशांच्या अनेक बँकांची मुख्यालये ब्रिटनमध्ये आहेत. त्यांनी ही मुख्यालये ब्रिटनबाहेर हलवू अशी धमकी दिली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज