मुंबईतील समायोजन एकाच ठिकाणी
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
शिक्षण विभागातर्फे मुंबईत बुधवारी झालेल्या शिक्षक समायोजन प्रक्रियेत शिक्षकांना गैरसोयीचा फटका सहन करावा लागला. मुंबईच्या तिन्ही जिल्ह्यांची प्रक्रिया एकाच ठिकाणी आयोजित केल्याने याठिकाणी पुरता गोंधळ उडाल्याची तक्रार शिक्षकांकडून करण्यात आली. मुख्य म्हणजे, या प्रक्रियेसाठी मुख्याध्यापकांनाही बोलवण्यात आले होते. या संपूर्ण प्रक्रियेचा फज्जा उडाल्याचे शिक्षकांनी सांगितले.
राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या नव्या संचमान्येतच्या अध्यादेशानुसार मुंबईसह राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी राज्यभरात प्रक्रिया सुरू करण्यात आली असून मुंबईसाठी बुधवारचा मुहूर्त निवडण्यात आला होता. त्यानुसार कुर्ला येथील होली क्रॉस शाळेत या शिक्षकांना समायोजनाच्या प्रक्रियेसाठी बोलविण्यात आले होते. मुंबई शहर, पश्चिम विभाग आणि पूर्व विभाग या तिन्ही विभागांचे समायोजन याठिकाणी आयोजित करण्यात आले होते. सकाळी १० वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार होती. त्यानुसार मुंबईभरातील शिक्षकांनी सकाळी साडेसात वाजल्यापासूनच याठिकाणी गर्दी करण्यास सुरूवात केली. तिन्ही विभागांची समायोजन प्रक्रिया या एकाच ठिकाणी आयोजित केल्याने शिक्षकांना गैरसोयींना तोंड द्यावे लागले. दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते म्हणून शिक्षकांवर नेहमी टीका करणाऱ्या शिक्षण विभागाने याची दखल का घेतली नाही? असा संतप्त सवाल उपस्थित शिक्षकांकडून करण्यात आला. या ठिकाणी उपस्थित शिक्षकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली नसल्याने उपस्थित सर्व शिक्षकांनी राज्य शिक्षण विभागाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. सकाळी १० वाजता सुरू झालेली ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरुच होती.
याबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ महामंडळाचे प्रवक्ते प्रशांत रेडीज म्हणाले की, हा गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही या अगोदरच शिक्षण विभागाला वेळोवेळी १६ ते २४ जुलै दरम्यान कळविले होते. इतकेच नव्हे तर राज्यात इतरत्र जिल्ह्यानुसार समायोजनाची प्रक्रिया राबविली असताना फक्त मुंबईतच एकाच ठिकाणी ही प्रक्रिया राबविण्यात आली याबाबत शिक्षण विभागाने खुलासा करावा.
जागा ८२ शिक्षक ५८२
अगोदरच अतिरिक्त ठरल्याने नाराजी असताना आजच्या समायोजनाच्या प्रक्रियेतील गैरसोयीमुळे शिक्षकांनी शिक्षण विभागाविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. मुंबईत समायोजनासाठी फक्त ८२ जागा असून अतिरिक्त शिक्षकांची संख्या ५८६ च्या घरात असल्याने उर्वारित शिक्षकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबईच्या समायोजनाची प्रक्रिया एकाच ठिकाणी होत असल्याने गर्दी झाली होती. परंतु त्याला गैरसोय म्हणता येणार नाही. मुंबईतील समायोजनाच्या जागा ८२ असल्याने पहिल्याच शंभर जणांना थांबविण्यास सांगण्यात आले होते. उद्या सुट्टी असल्याने त्याचा फटका बसू नये म्हणून ही प्रक्रिया आजच संपविण्याचा आमचा प्रयत्न होता.
बी. बी. चव्हाण,
शिक्षण उपसंचालक