म. टा. प्रतिनिधी, मुंबई
वाढती महागाई, अवकाळी पाऊस यामुळे हैराण झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबड्यांच्या व्यवसायातून कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या अॅग्रो कंपनीविरोधात आज, शुक्रवारी कडकनाथ कोंबडी पालन संघर्ष समितीच्या नेतृत्त्वाखाली धडक मोर्चा आणि आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या प्रकरणामध्ये कंपनीने केलेली फसवणुकीमध्ये कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांनी या प्रकरणामध्ये त्वरित न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. या कंपनीच्या संचालकांवर एमपीआयडीअंतर्गत गुन्हे दाखल करून सक्षम अधिकाऱ्यांकडून तपास करण्यात यावा आणि जलदगती न्यायालयामध्ये खटला चालवावा, या मागणीसाठी हा धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे कडकनाथ कोंबडी पालन संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे.