म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
शेतीसाठी आम्ही जिंदगी कुर्बान करू पण शेतीतून उत्पन्न न मिळाल्यास पोटापाण्याचे करायचे काय? एवढे काबाडकष्ट करून अर्धपोटी राबण्यापेक्षा पोलिसाची मानाची नोकरी मिळवणे चांगले, घरच्यांना आधार देण्यासाठी सरकारी नोकरी भरवशाची...जालन्यातून आलेला प्रसाद सांगतो! अल्प भूधारक शेतकऱ्याच्या घरातील प्रसादसारखे शेकडो पदवीधर तरुण पोलिस होण्याच्या इर्षेने भरतीत यशस्वी होण्यासाठी काही महिन्यांपासून जीवापाड प्रयत्न करत आहे. मुंबईत घरदार, मित्र, नातेवाईक नसल्याने जिथे मिळेल तिथे बस्तान मांडून परीक्षा उत्तीर्ण होण्याची स्वप्ने पाहत आहेत.
मुंबई पोलिस भरतीची जाहिरात निघाली आणि राज्यातून सुमारे १ लाख ७५ हजार उमेदवारांनी अर्ज केले. नियमानुसार कागदपत्रांची तपासणी आणि शारीरिक क्षमता चाचणीच्या पहिल्या टप्प्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. मुंबई पोलिस दलात १४४९ पदे असून त्यासाठी आलेल्या अर्जांची संख्या राज्यातील बेरोजगारी दर्शवणारी असल्याचे मत भरती प्रक्रियेत आलेल्या उमेदवारांचे म्हणणे आहे. सरकारी नोकरी कोणाला नको? शेती ही बिनभरवशाची राहिली, कधी अवकाळी पाऊस येतो तर कधी पाऊस येतच नाही.. अशा प्रसंगांना तोंड देताना शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातून सरकारी नोकरीत संधी मिळाली तर कुटुंबांस आधार मिळेल, असे स्वप्न रंगवत हजारो तरुणांनी परीक्षेचे अर्ज भरले आहेत.
मुंबईत नोकरी मिळवण्याच्या आकर्षणाने झपाटलेल्या तरुणांमध्ये पदवीधर, पदव्युत्तर, उच्चशिक्षित तरुणांची संख्या प्रचंड आहे. ही शैक्षणिक पात्रता पोलिस अधिकारी वा अन्य संवर्गांसाठी लागू आहे. पण आता पोलिस शिपाई भरती असल्याने त्यासाठी प्रयत्न केले जात आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त भागासह नाशिक, कोल्हापूर, नगरमधून आलेले तरुण पाठीवर सॅक घेऊन मैदानाजवळ पोहोचत आहेत.
काहिलीत शारीरिक क्षमतेची परीक्षा
नायगाव-मरोळ पोलिस मैदानांप्रमाणेच गोरेगावमधील राज्य राखीव पोलिस दलाच्या मैदानात ९ मेपर्यंत टप्प्याटप्प्यात भरती परीक्षा सुरू आहे. उन्हाची काहिली वाढत असतानाच मुंबईत पोलिस भरतीचा वेग ऐन भरात आहे. शारीरिक चाचणी परीक्षेचा कालावधी साधारण दीड दिवसांचा असून त्यात १०० मीटर धावण्यापासून उंच उडी, १६०० मीटर धावण्यासारख्या परीक्षांचा समावेश आहे.
मिळेल तिथे मुक्काम
मुंबईत आसरा नसलेल्या तरुणांकडून जागा मिळेल तिथे बस्तान मांडले जात आहे. फुटपाथवर वा कुठेही स्वस्तात जागा मिळेल तिथे निवारा घेतला जात आहे. मैदानांच्या ठिकाणी पोलिस विभागाने पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची उत्तम सुविधा केली असून पोलिस चांगली वागणूक देत असल्याचे उमेदवार सांगतात.