उपनगरात १२, शहरात आठ उमेदवारांचे अर्ज
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली असून मुंबईत आतापर्यंत १४ मतदारसंघांतील एकूण २० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. २२ मतदासंघांमधून अद्याप एकही अर्ज आलेला नाही.
उपनगर जिल्ह्यातील २६ पैकी १० मतदारसंघांतून मंगळवारी दिवसभरात ११ अर्ज दाखल झाले आहेत. यापूर्वी सोमवारी एका अर्ज दाखल झाला होता. तरीही उपनगरांतील १६ मतदारसंघांमध्ये अद्याप एकही अर्ज भरला गेलेला नाही. शहर जिल्हा प्रशासनांतर्गत १० मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांतून आठ अर्ज दाखल झाले आहेत. मलबार हिल व भायखळा मतदारसंघातून प्रत्येकी तीन, तर मुंबादेवी आणि कुलाबा मतदारसंघांतून प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज आला आहे. सहा मतदारसंघांमधून एकही अर्ज आलेला नाही.
विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी मागाठाणे मतदारसंघातून शिवसेनेतर्फे प्रकाश सुर्वे, मानखुर्दमधून समाजवादी पार्टीकडून अबु आझमी, मलबार हिल मतदारसंघातून भाजपचे मंगलप्रभात लोढा, कुलाबा मतदारसंघातून काँग्रेसचे अशोक (भाई) जगताप, भायखळा मतदारसंघातून अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांनी अर्ज दाखल केला आहे.