तोंड दाबून बुक्के
'शांतिदूत की यमदूत' हा कबुतरांवरील लेख प्रत्येक मुंबईकरांच्या मनातील भावना व्यक्त करणारा आहे. पूर्वी मुंबईत ठराविक ठिकाणीच कबुतरांना दाणे घातले जात. पण आता कबुतरांना दाणे घालून पुण्य कमविणारे वाढल्याने मुंबईत सर्वत्र कबुतरांचा त्रास असूनही तो तोंड दाबून बुक्क्यांचा मारासारखा सोसला जातो. आता तर कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनविकार होतात हे सिद्ध झाले आहे, तरी लोकांचे पुण्यकर्म थांबत नाही. हे थांबवायलाच हवे.
- माया हेमंत भाटकर, चारकोप गाव
.............................
पुरावे पाहूनच विधाने
माझ्या राज्यपालनियुक्त विधिमंडळ सदस्यत्वाविषयी लिहिलेल्या लेखावर शिवसेना नेते शिशिर शिंदे यांनी प्रतिक्रिया लिहिली आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे फौजिया खान आणि दत्ता मेघे हे नामनियुक्त सदस्य असूनही मंत्री होते. तरीही, नामनियुक सदस्य मंत्री होऊ शकत नाही, याबाबत मी केलेल्या युक्तिवादात व त्याच्या ठोसपणात काही फरक पडत नाही. शिंदे यांनी माझ्या युक्तिवादांचा प्रतिवाद केलेला नाही व वरील दोघांच्या मंत्रिपदाचा वाद न्यायालयात जाऊन न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले होते, असेही म्हटलेले नाही. दुसरे असे की एखादी कायद्याने चुकीची गोष्ट भूतकाळात घडली असेल व तिला आव्हान दिले गेले नसेल, तरी ती गोष्ट कायदेशीर होती, असे नाही व ते उदाहरण आज उचित नसते. त्यांनी लेखात चुकीची विधाने केली आहेत, असे म्हटले आहे. ते योग्य नाही. मी सारी विधाने पुरावे तपासूनच केली आहेत.
- विजय त्र्यंबक गोखले
...........................
शुद्ध विचार हवेत!
लॉकडाउन कालावधीमध्ये दूरदर्शनवर रामायण, महाभारत या पौराणिक मालिका चालू आहेत. त्यांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या दोन मालिका एकाच दिवशी पाहण्याची संधी मिळेल असे वाटले नव्हते. मात्र, आज ती १३५ कोटींची जनसंख्या असलेल्या देशवासीयांना मिळाली आहे. केवळ मालिका मनोरंजन म्हणून न पाहाता त्यातून बोध घेत प्रत्यक्ष जीवनात त्याप्रमाणे आचरण ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. अन्यथा, 'नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे' असे होईल. दुसरे सूत्र असे की, लॉकडाउनमध्ये पोर्न (अश्लील) वेबसाइट्स पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे त्या वेबसाइट्सनी सांगितले आहे. भारताचाही यात सहभाग आहे. नैतिकता-नीतिमत्ता टिकवून ठेवण्यासाठी योग्य विचारांची आवश्यकता असते. अन्यथा, समोर कितीही चांगले विचार प्रदर्शित होत असले, तरी ते ग्रहण करता न आल्याने चुकीच्या दिशेने भरकटायला होते. हे येथे लक्षात येते. अश्लील विचारांचा बिमोड करण्यासाठी शुद्ध विचारांचीच शिदोरी उपयोगी आहे. अश्लीलतेने समाजात टोक गाठले आहे. परिणामी लैगिंक शोषणाच्या घटनांत वाढ झाली आहे. 'वाल्याचा वाल्मिकी' होऊ शकतो हा इतिहास असला, तरी आजही ते शक्य आहे. त्यामुळे विचार शुद्ध कसे राहातील याकडे लक्ष ठेवूया.
- जयेश राणे, भांडुप
.............................
मद्यमहसुलाचा मोह
मद्यमहसुलाचे टाळे उघडण्याचा विचार सरकार करत असल्याचे वाचले. दारुविक्री बंदी उठवली, तर राज्याला महिन्याला जवळपास सव्वादोन हजार कोटी रुपयांचा महसूल मिळेल. सध्याच्या अर्थदुष्काळात महसूल घटत असताना त्याची अत्यंत जरुरी आहे. मद्यविक्री करताना सुरक्षित शरीरअंतर, वावर आदींसारखे कठोर निकष लावले म्हणजे झाले. त्यामुळे बेचैन तळीराम निदान सॅनिटायझर, कफावरील औषधे, गटारातील नवसागरी दारू चोरून पिण्याचे थांबतील असापण सारासार विचार करूया. मद्यदुकाने सुरू करा, ही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली मागणी मान्य झाली, तर या विषयाला एक वेगळाच 'कोन' तयार होईल, असे पण उगाच वाटते.
- श्रीनिवास डोंगरे, दादर
...........................
धीर धरा, घाबरू नका!
गेले काही आठवडे करोनाच्या उलटसुलट चर्चा आणि बातम्या ऐकून हा नेमका काय प्रकार आहे, हेच समजेनासे झाले आहे. मनात प्रचंड गोंधळ आहे. हा खरोखर एक रोग आहे की, ती एक काल्पनिक भीती आहे, असा विचार मनात येतो. जी माणसे मरत आहेत, ती रोगाने की प्रचंड दडपणाने मरत आहेत? कारण ज्या रुग्णांना हा रोग झाला आहे त्यांना अशा ठिकाणी ठेवतात (हॅास्पिटल) त्या ठिकाणी आजूबाजूला जी माणसे वावरत असतात ती माणसंच आहेत ना? अशी शंका त्यांना येऊ शकते. कारण त्या सर्व लोकांनी स्वतःला डोक्यापासून पायापर्यंत झाकून घेतले असते. अशा या वातावरणामुळे रोगी घाबरलेला असतो, मानसिकदृष्ट्या खचतो. त्यामुळे उपचारांना तो कितपत प्रतिसाद देत असेल हे समजत नाही. या प्रचंड मानसिक दडपणामुळे कमकुवत मनाची माणसे प्राण सोडत असावीत. मानसोपचारतज्ज्ञांनी या रुग्णांचे समुपदेशन केले, तर मरणारांची संख्या कमी होईल आणि ते बरे होतील. कारण करोना विषाणू हा रोग नसून भीतीचा राक्षस आहे. मुळात शंभरपैकी ६० लोक हे मनाने कमकुवत असतात आणि आपण करोनाग्रस्त आहोत हे समजल्यावर ते गर्भगळीत होतात. मग तो राक्षस त्यांना गिळतो.
- शांताराम मंजुरे, अंबरनाथ
........................
डॉक्टरांना जपा
आपला 'स्वागतार्ह वटहुकूम' हा अग्रलेख वाचला. मनाला सुन्न करणाऱ्या घटना घडत आहेत. एकीकडे तुमचे जीव वाचवायचे आणि तुम्हीच आम्हांला डसायचे, असे विदारक चित्र मनाला अस्वस्थ करते. या गंभीर अडचणीत मोलाचे सहकार्य मिळतेय त्याचे कुठेच मोल नाही. आणि काही लोक म्हणतील की, डॉक्टरांचे आरोग्यसेवा देणे हे कामच आहे. परंतु ते जीव धोक्यात घालून तुमच्यावर उपचार करतात हे विसरून चालणार नाही. त्यांनाही संविधानात जगण्याचे स्वातंत्र्य दिले आहे ना! मग का इतकी हेटाळणी त्यांची? त्यांचे पण कुटुंब आहे. दरदिवशी ते किती कासावीस होत असतील. मग का हाल करताहेत त्यांचे. नर्स व डॉक्टरचे, नव्हेच तर पोलिस, प्रशासकीय अधिकारी, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, सफाई कामगार आणि या करोना महासंकटात चोख कामगिरी बजावत असलेल्या लोकांसाठीही सरकारने योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. त्यांचे मानसिक, सामाजिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सरकारच्या निर्णयाचे स्वागत.
- हरिश्चंद्र पवार
................................
विचारवंतांनो, जागे व्हा!
करोना साथीच्या पार्श्वभूमीवर आज कोण आपले आणि कोण परके याची ओळख होऊ लागली आहे. एकीकडे अनेक भारतीय कंपन्या, उद्योगपती यांनी करोना निर्मूलनासाठी तिजोऱ्या उघडल्या आहेत, तर दुसरीकडे काही सधन आणि विदेशी कंपन्या यांनी हात आखडले आहेत. देशात करोना रुग्ण वाढण्यामागे तबलिगी समाजाचा संबंध असल्याचे केंद्रीय गृहखात्याने स्पष्ट केल्यानंतरही स्वतःला पुरोगामी विचारवंत म्हणवून घेणारा वर्ग आज सोयीने मूग गिळून बसला आहे. आरोग्य सेवकांवर, पोलिसांवर ठिकठिकाणी हल्ले होत असताना हा विचारवंत वर्ग साधी प्रतिक्रिया देण्याचीही तसदी घेत नाही. पालघरमध्ये दोन साधू आणि त्यांच्या चालकाच्या झालेल्या निर्घृण हत्येने देश हळहळला. या हत्येची सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत असताना या पुरोगामी मंडळींना देशातील कायदा आणि सुव्यवस्थेविषयी काहीच बोलायचे नाही. पत्रकार अर्णव गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीवर झालेला हल्ला यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला वाटत नाही. मार्चपर्यंत शाहीनबाग आंदोलनाच्या समर्थनार्थ सक्रिय असलेला हा तथाकथित विचारवंतांचा वर्ग आज सोशल मीडियापासून दुरावण्याचे कारण काय असावे ? केवळ भारतातील एका वर्गाच्या आणि त्या वर्गाची तळी उचलणाऱ्यांच्याच समर्थनार्थ हा वर्ग जागा होतो का?
- जगन घाणेकर, घाटकोपर
........................
काळ मोठा कठीण
'न भूतो न भविष्यति' अशी परिस्थिती जगावर ओढवली आहे. त्याचा परिणाम प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे मानवी मनांवर होत आहे. याचा प्रत्यय महाराष्ट्रातील मानसिकतेचा विचार केला तर १८ दिवसांत २५ हजार जणांनी 'एम पॉवर वन ऑन वन' या समुपदेशन करणाऱ्या हेल्पलाइनवर कॉल केले आणि मानसिक अस्वस्थता व्यक्त केली. म्हणजेच करोनाने विश्व अंतर्बाह्य ढवळून काढले आहे. मानसिक तणावामुळे अस्वस्थता, नोकरी, आरोग्य, मुलांची काळजी.. या साऱ्यामुळे जोडीदाराबरोबर होणारे वाद आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक समस्या आहेत. या कॉल करणाऱ्यांमध्ये स्रियांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत दहा टक्के अधिक आहे. ही मोठी चिंतेची बाब आहे. याचा अर्थ एक सूक्ष्म विषाणू काय काय करू शकतो याचा प्रत्यय येतो आहे. काळ मोठा कठीण तेव्हा संकटाला मानसिक संतुलन न बिघडवता धैर्याने सामोरे जाण्याची गरज आहे.
- दत्तप्रसाद शिरोडकर, मुलुंड
.............................
निधीचा दुटप्पीपणा
मुंबईतील उंच टॉवर, त्यातील आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये, त्याचबरोबर मुंबईतील झोपडपट्टी, या भौगोलिक परिस्थितीचा आणि लोकसंख्येचा कोणी विचार केला आहे का? मुंबई व महाराष्ट्राचा करोना मृत्युदर वाढत असला तरी उपचार घेऊन बरे होणाऱ्यांची संख्या ही इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. याचा विचार करता महाराष्ट्रातून जीएसटी कर सर्वात जास्त म्हणजे २२ टक्के देण्यात येतो. पण मागील जीएसटीचे १६ हजार कोटींचे येणे बाकी आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रच्या महसूलमंत्र्यांनी २५ हजार कोटी मागितले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधी, आणि पंतप्रधान सहायता निधी या दोन्ही निधीतील फारकामुळे राज्य सरकारच्या निधीवर फरक पडत आहे. अशा प्रकारे केंद्र सरकार आर्थिक दुजाभाव व दुटप्पीपणा करत आहे. उलट महाराष्ट्राचे भाजपनेते नको ते राजकारण करीत, कधी वांद्रे स्थानकावर गर्दी, पालघर साधूंचे मृत्यू, मुंबई महापालिकेच्या ठेवी इत्यादी विषयांवर बोलत आहेत. त्यापेक्षा त्यांनी केंद्र सरकारकडून आर्थिक देणी मिळण्यासाठी आग्रह धरावा.
- विजय कदम, लोअर परळ
..................................
येण्याचा हेतू काय?
केंद्राने एक पथक मुंबईत पाठविले होते. मुंबईत एवढे रुग्ण का वाढले आणि त्यासाठी सरकारने काय उपाययोजना केली याचा आढावा घेण्यासाठी हे पथक आले. पण या पथकाने दिलेला अहवाल पाहून मुंबईकर थक्कच झाले. ३० एप्रिलपर्यंत मुंबईत ४० हजार रुग्ण वाढतील असा अहवाल या केंद्रीय पथकाने दिला. आश्चर्य याचे वाटते की कोरोनाला घाबरू नका, धीराने तोंड द्या, असे पंतप्रधान मोदी सांगतात पण पथकाने कोणताही उपाय किंवा साह्य न देता मुंबईकरांना घाबरविले. हे पथक महाराष्ट्र सरकार किती अपयशी आहे दाखविण्यासाठी आले होते का?
- अरुण खटावकर, लालबाग
..............................
उगाच घाबरवू नका!
मुंबईचे गणित धोक्याचे? ही बातमी वाचून पोटात गोळा उठला. मे महिन्यात करोनाग्रस्त सहा लाख होणार असा अंदाज असेल तर प्रत्येक मुंबईकराने निरवानिरव करायला घ्यायची की काय? प्रत्यक्षाच मुंबईत बरे होऊन घरी जाणारेही खूप आहेत. त्यामुळे, असा अंदाज वर्तवून घबराट पसरविण्यापेक्षा मुंबईकरांना लॉकडाउनचे नियम प्रामाणिकपणे पाळायची सवय लावली पाहिजे.
- माया भाटकर, चारकोप
................
टोल माफ करा
लॉकडाउन काळात सार्वजनिक वाहने बंद आहेत आणि ते योग्य आहे. परंतु अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टर, रुग्णालयातील, सरकारी, सार्वजनिक सेवेतील, बँक अशा अनेक सेवांमधील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी जावे लागते. अनेक कर्मचारी सुरक्षितता म्हणून परवडत नसतानाही स्वत:ची वाहने घेऊन कामाच्या ठिकाणी जातात. हे संकट दूर होईपर्यंत सरकारने अशा सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना टोल माफ करावा.
- विश्वनाथ पंडित, ठाणे