अ‍ॅपशहर

प्राणी, पक्ष्यांनाही उष्माघात

ऑक्टोबरच्या पहिल्याच तारखेपासून झेपावलेल्या पाऱ्यामुळे माणसांसोबतच पाळीव प्राणी आणि पक्षी यांनाही त्रास झाला आहे. वातावरणामध्ये मध्येच निर्माण होणारी आर्द्रता, मध्येच निर्मा

Maharashtra Times 10 Oct 2018, 4:00 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम oct


ऑक्टोबरच्या पहिल्याच तारखेपासून झेपावलेल्या पाऱ्यामुळे माणसांसोबतच पाळीव प्राणी आणि पक्षी यांनाही त्रास झाला आहे. वातावरणामध्ये मध्येच निर्माण होणारी आर्द्रता, मध्येच निर्माण होणारा कोरडेपणा यामुळे माणसांसोबतच प्राण्यांमध्येही ताप, त्वचाविकार असे आजार आढळून येत आहेत.

परळ येथील बाई साखराबाई दिनशॉ पेटिट रुग्णालयामध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या तारखेपासून अवघ्या दहा दिवसांमध्ये ३० ते ३५ कुत्रे, २० ते २५ मांजरी आणि सुमारे ७० पक्षी उपचारांसाठी दाखल झाले आहेत. रस्त्यावरील प्राणी आणि पक्ष्यांपेक्षा या उन्हाचा फटका पाळीव प्राण्यांना अधिक बसला आहे, असे रुग्णालयाचे सचिव कर्नल के. सी. खन्ना यांनी स्पष्ट केले. रस्त्यावर फिरणाऱ्या प्राण्यांना अनेकदा या उन्हाची सवय असते. मात्र पाळीव प्राणी दिवसभर एसीमध्ये असतात. त्यांना घराबाहेर आणल्यावर हा उष्मा सहन होत नाही. परिणामी त्यांच्यामध्ये आजाराचे प्रमाण वाढते, असे त्यांनी सांगितले.

या प्राण्यांमध्ये जुलाब, उलट्या, ताप आणि त्वचाविकार आढळून येत आहेत. त्यातही विदेशांमधून भारतात आणलेल्या प्राण्यांना हा उन्हाचा त्रास अधिक होत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. सायबेरियन कुत्रे, पर्शिअन मांजरी, सेंट बर्नार्ड प्रजातीचे कुत्रे, ग्रेट डेन कुत्रे यांना सध्या इतर कोणत्याही प्रजातींपेक्षा उन्हाचा अधिक त्रास होत आहे. या प्राण्यांच्या प्रजातींना थंड वातावरणाची सवय असते. मुंबईचे तापमान सध्या ३७ अंशांपलीकडे पोहोचल्याने उन्हाच्या झळा त्यांना पोहोचत आहेत.

गेल्या ऑक्टोबरपेक्षा यंदा १५ ते २० टक्के अधिक प्राणी रुग्णालयात दाखल झाले आहेत. पक्ष्यांमध्येही कबुतरांचे प्रमाण अधिक आहे. त्याचबरोबर घार, घुबड हे पक्षीही उन्हामुळे आजारी पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या काळात प्राण्यांवर वाढणाऱ्या परजीवींना पोषक वातावरण मिळते. त्यामुळे त्वचाविकारांचा सामना माणसाप्रमाणेच प्राण्यांनाही करावा लागत आहे.

पाळीव प्राणी अनेकदा घरात दिवसभर एसीमध्ये असतात आणि बाहेर पडल्यावर उन्हाच्या झळा अंगावर येतात. त्याचा त्रास प्राण्यांना अधिक होतो. त्यामुळे एसीच्या वातावरणाबाहेर पडताना आधी प्राण्यांना साध्या खोलीत घेऊन जावे. त्यांना वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी मदत करावी आणि त्यानंतरच त्यांना घराबाहेर न्यावे. यामुळे उन्हाचा कमी त्रास होईल, असा उपाय कर्नल खन्ना यांनी सुचवला. पक्ष्यांना पाणी पिण्याची सोय व्हावी म्हणून बर्ड फीडर, पाण्याच्या वाट्या ठेवल्यास उन्हामध्ये त्यांना पाण्याच्या शोधात फिरावे लागणार नाही आणि पाण्यावाचून तडफडावे लागणार नाही. त्यासाठी मुंबईकरांनीही जागरुकता बाळगावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

अन्नाचे प्रमाण कमी करावे

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अन्नाचे प्रमाण कमी करण्यात यावे, कमी अन्न आणि हे अन्न देण्याच्या वेळा वाढवाव्यात अशी सूचना खन्ना यांनी दिली. तसेच आहारामध्ये दही, ताक याचा अंतर्भाव करावा, अधिक पाणी प्यावे, असेही ते म्हणाले. त्वचाविकार झाले असतील तर मांसाहार कमी करावा. प्राणी आजारी पडल्यावर त्यांनी प्राथमिक उपचारांना दाद दिली नाही तर ताबडतोब प्राण्यांच्या तज्ज्ञांकडे न्यावे अन्यथा आजाराचे प्रमाण अधिक बळावण्याची शक्यता असते, असेही ते म्हणाले.

- उन्हाचा फटका विदेशातून आणलेल्या पाळीव प्राण्यांना अधिक

- ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णालयातील संख्या मोठी

- गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हे प्रमाण १५ ते २० टक्के जास्त

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज