म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाच्या प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या अवस्थेबद्दल अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण होते. यासंदर्भात माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार मे, २०१७ ते मे, २०१८ या कालावधीत ११ पक्षी, २० सस्तन प्राणी आणि एक सरपटणारा प्राणी आजारी पडला. यातील चार सस्तन प्राण्यांचा आणि पाच पक्ष्यांचा मृत्यू ओढवल्याचे समोर आले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी सप्टेंबर, २०१८मध्ये माहिती अधिकार अर्ज दाखल केला होता. या अर्जामध्ये प्राणीसंग्रहालयातील किती प्राणी गेल्या वर्षभरात आजारी पडले, त्यांच्यावर कुठे उपचार झाले, त्यातील किती प्राण्यांचा मृत्यू झाला, गेल्या पाच वर्षांमध्ये किती प्राण्यांना कॅन्सर झाला होता, त्याने किती प्राणी दगावले यासंदर्भात विचारणा केली होती. माहिती अधिकारात मिळालेल्या उत्तरानुसार गेल्या पाच वर्षांमध्ये एकाही प्राण्याला कॅन्सर झाला नसल्याचे उघड झाले आहे. मात्र मे, २०१७ ते मे, २०१८ या कालावधीमध्ये एकूण ११ पक्षी, २० सस्तन प्राणी आणि एक सरपटणारा प्राणी आजारी पडला. यात पोपट, चित्रबलाक, मिलिटरी मकाव, सारस, ऑस्ट्रेलियामध्ये आढळणारा पोपट यांचा मृत्यू झाला आहे. यातील चार पक्षी आपापसातील भांडणादरम्यान जखमी झाले होते, तर एका पक्ष्याचा मृत्यू खाण्यावरील वासना उडाल्याने झाला आहे, असे यात नमूद करण्यात आले आहे. भांडणामध्ये पंखाला झालेली इजा, चोचीला झालेली इजा यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.
प्राण्यांमध्ये एकूण २० प्राणी जखमी झाले होते. त्यांच्यावर प्राणीसंग्रहालयातील रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र त्यापैकी दोन ऱ्हिसस माकडे, पाणघोडा आणि एका तरसाचा मृत्यू झाला. एका ऱ्हिसस माकडाचा मृत्यू जबडा उघडता न आल्याने मृत्यू झाल्याचे या माहिती अधिकारात मिळालेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर तरसाचा मृत्यू मागच्या पायावर संधीवातामुळे झालेल्या बेडसोरमुळे झाला आहे. पाणघोडा धनुर्वातामुळे दगावला आहे, तर दुसरे माकड मागच्या पायात गाठ झाल्याने दगावले. (पूर्वार्ध)
संरक्षित असूनही मृत्यूसंख्या अधिक?
प्राणीसंग्रहालयात वन्यक्षेत्रापेक्षा अधिक संरक्षित आणि नियंत्रित वातावरण असते. अशा वेळी वर्षभरात एकूण नऊ प्राणी-पक्ष्यांचा मृत्यू होणे यामुळे अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित होत आहेत. संरक्षित आणि नियंत्रित वातावरणामध्ये एखादा प्राण्याचा किंवा पक्ष्याचा मृत्यू वृद्धापकाळामुळे झाल्यास त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होणार नाही. मात्र हे प्राणी आजारी पडून किंवा चोच आणि पंख तुटून त्यांचा मृत्यू ओढवतो कसा, असा प्रश्न कोठारी यांनी उपस्थित केला आहे. प्राण्यांच्या शरीराला सूज येणे, डोळ्याला जखम, पायात गाठ, संधीवात असे आजार झाल्याचे अहवालामुळे निदर्शनास आले आहे
प्राण्यांची काळजी घेण्यासाठी नेमलेले काळजीवाहक सक्षम आहेत आणि या प्राण्यांना एखादा आजार झाल्यावर त्याची लक्षणे ताबडतोब त्यांच्या पिंजऱ्यावर लक्ष ठेवणाऱ्यांना कळतात का असा प्रश्न प्राण्यांच्या मृत्यूतून उपस्थित होत आहे. - चेतन कोठारी, माहिती अधिकार कार्यकर्ते