अ‍ॅपशहर

शब्दांकडून अक्षराकडे

: पहिलीच्या वर्गातून आता क - कमळाचा, घ - घराचा हे वदवून घेण्याची पद्धत हद्दपार होणार असून विद्यार्थ्यांच्या कल्पनेतील शब्दांमधून त्यांना अक्षरांची ओळख करून देण्याची प्रक्रिया होणार आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे.

Maharashtra Times 16 Jun 2018, 9:45 am
मुंबई : पहिलीच्या वर्गातून आता क - कमळाचा, घ - घराचा हे वदवून घेण्याची पद्धत हद्दपार होणार असून विद्यार्थ्यांच्या कल्पनेतील शब्दांमधून त्यांना अक्षरांची ओळख करून देण्याची प्रक्रिया होणार आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला असून तो विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आला आहे. यामुळे यापुढे पहिलीच्या वर्गातील शिकवण्याचा प्रवास शब्दांकडून अक्षराकडे होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम from words to alphabet
शब्दांकडून अक्षराकडे


विद्यार्थी जेव्हा पहिल्या इयत्तेमध्ये प्रवेश करतो तेव्हा तो सहा वर्षांचा झालेला असतो. यामुळे त्याला अनेक शब्द माहिती झालेले असतात. त्याची कल्पनाशक्ती बहरत असते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षणात घोकंपट्टी करून शिकवण्यापेक्षा त्यांच्या कलाने कसे शिकवता येईल यासाठी हे महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. आत्तापर्यंतच्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी अक्षराकडे एखाद्या आकृतीप्रमाणे पाहात होते. मात्र आता विद्यार्थ्यांना अक्षराच्या रचनेबरोबरच त्याचा अर्थबोधही होणार आहे. यासाठी सहा अक्षर गट तयार करण्यात आले आहेत. या प्रत्येक अक्षर गटामध्ये एक स्वर देण्यात आला आहे. यामुळे मूळाक्षराला स्वर जोडल्यावर नवे अक्षर कसे तयार होते हेही विद्यार्थ्याला सहज समजणार आहे. विद्यार्थ्यांना शिकवताना प्रत्येक अक्षर गटातील अक्षरांवरून त्याला येणारे शब्द विचारले जाणार असून त्यातून त्याला अक्षर ओळख करून दिली जाणार आहे. अशा प्रकारे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अक्षराची परिपूर्ण ओळख होणार असून त्याचा ध्वनीही त्यांना लक्षात राहणार आहे, असे शिक्षणमंत्री विनोद ताडे यांच्या विशेष कार्य अधिकारी प्राची साठ्ये यांनी सांगितले.

पुस्तकाची रचनाही सुलभ करण्यात आली असून सुरुवातीला एका पानावर एकच अक्षर आहे. मग अक्षरांची संख्या वाढवत नेली आहे. तसेच विद्यार्थ्यांना अक्षर लिहावे कसे हे समजण्यासाठी अक्षर गिरवण्याची कृतीही देण्यात आल्याचे साठ्ये म्हणाल्या. या पुस्तकात प्रचलित व छान चाली असलेल्या बालगीतांचा समावेशही करण्यात आला आहे. त्याचबरोबर गोष्टींचाही समावेश केला आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळांतील प्रयोगशील शिक्षकांनी भाषा विषय शिकवण्यासाठी यापूर्वी यातील काही प्रयोग केले आहेत. या प्रयोगांमध्ये अधिक सुधारणा करीत हे महत्त्वपूर्ण बदल करण्यात आल्याचे साठ्ये यांनी सांगितले.

अभिव्यक्तीला वाव

विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला वाव मिळावा या उद्देशाने पुस्तकात चित्रवर्णनाची कृती देण्यात आली आहे. यामध्ये सुरुवातीला घर, मग शाळा परिसर, जत्रेचे वर्णन अशा विविध गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. हे चित्र पाहून विद्यार्थ्यांना काय वाटते हे जाणून घेऊन त्यांना ते त्यांच्या शब्दांत वर्णन करण्यास सांगितले जाणार आहे. यातून विद्यार्थ्यांची निरीक्षण शक्ती वाढण्यास मदत होईल आणि त्यांना भाषेवर पकड मिळवण्यास मदत होईल, असेही साठ्ये यांनी स्पष्ट केले.

संदर्भ समानता

गणित विषयाचा अभ्यासक्रमही बदलण्यात आला असून तो अधिक सुलभ करण्यात आला आहे. आता गप्पा आणि कृतींमधून गणित शिकविले जाणार आहे. शिक्षण विद्यार्थ्यांना सुलभ व्हावे या उद्देशाने दोन विषयांतील संदर्भ समान ठेवण्यात आले आहेत. म्हणजे मराठीच्या पुस्तकात प्राणी आणि वाद्य यावर कविता आहे, तर गणित विषयात वाद्यांचे दाखले देऊन गणित शिकविले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन लवकर होऊ शकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज