म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
रेल्वे, बेस्ट बंद असल्याने महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील असंख्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कामाकडे पाठ फिरवली आहे. करोनाच्या साथीत अधिक मनुष्यबळ आवश्यक असताना कर्मचारी गैरहजर राहत असल्याने अखेर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून, जे कर्मचारी सेवेत रूजू होणार नाहीत, त्यांना निलंबित केले जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
पालिकेत सुमारे एक लाख दहा हजार कर्मचारी असून, नोकरीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी वाहतूक सेवा नसल्याने अत्यावश्यक सेवेतील असंख्य कर्मचाऱ्यांना कामावर येणे शक्य झालेले नाही. करोना साथीसारख्या आणीबाणीच्या वेळी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकारी कर्तव्यावर असणे गरजेचे असताना ते सेवेत येत नसल्याने हजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहावे यासाठी प्रशासनाने दुपारचे जेवण देण्याचीही तयारी दर्शवली आहे. मात्र त्यानंतरही असंख्य कर्मचारी कामावर येत नसल्याने प्रशासनाने कारवाईचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.
पालिकेच्या या कारवाईला कामगार संघटनांनी विरोध केला असून 'ज्या तत्परतेने प्रशासनाने हे आदेश दिले आहेत, त्याच तत्परतेने कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्क, हॅण्डग्लोव्ह्ज, कॅप व इतर सुरक्षिततेची साधने द्यावीत. कर्मचाऱ्यांचे योग्य नियोजन करून त्यांना प्रवासाची साधने व भोजन व्यवस्था उपलब्ध करून देण्याची त्वरित कार्यवाही करावी', असे दी म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी म्हटले आहे.