वर्षभरात पुस्तकांचे रूपडे पालटणार
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
एकीकडे भिलारमध्ये पुस्तकांचे गाव देखण्या स्वरूपात आकार घेत असताना दुसरीकडे चर्नी रोड येथील सरकारी मध्यवर्ती मुद्रणालयाच्या ग्रंथभांडाराचे रूपात मात्र फारसा फरक पडलेला नाही. सरकारी ग्रंथभांडाराच्या दर्शनी भागातील पुस्तकांवर फारशी धूळ नसली तरी खालचा साठा तसाच धूळ भरलेल्या अवस्थेत दिसतो. मात्र येत्या वर्षभरात हे रूप पालटण्याची आशा आहे.
मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या संस्था विविध साहित्यिक प्रकल्प राबवतात. या प्रकल्पाच्या माध्यमातून सरकारी मुद्रणालयामध्ये छापली जाणारी पुस्तके या ग्रंथभांडारात उपलब्ध होतात. यामध्ये अनेक दुर्मिळ पुस्तकांचाही समावेश आहे. मात्र ही पुस्तके दुर्लक्षित अवस्थेतच आहेत. पुस्तकांचे दुमडलेले कोपरे, काही पुस्तकांच्या मुखपृष्ठावर कसरीमुळे निर्माण झालेली जाळी, पुस्तकांची पिवळी पडलेली पाने हे या पुस्तकांचे वर्षानुवर्षांचे वास्तव आहे. यासंदर्भात मुद्रणालयातील सरकारी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुस्तकांची काळजी घ्यायला चतुर्थ श्रेणी कामगार वर्ग उपलब्ध नाही, त्यामुळे ही धूळ झटकली जात नाही, असे सांगण्यात येते.
मात्र, हे चित्र बदलण्याची आशा निर्माण झाली आहे. मुद्रणालयाच्या आवारात सध्या जिथे कॅन्टीन आहे ती जागा पुस्तकांच्या प्रदर्शनासाठी वापरण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव सरकार दरबारी आहे, अशी माहिती मुद्रणालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. चर्नी रोड स्टेशनला लागून जे मुद्रणालयाचे दुसरे गेट आहे, तिथपर्यंत ही पुस्तके दर्शनी भागात विस्तृत पद्धतीने मांडण्यात येतील. याचा कच्चा आराखडा तयार आहे. प्रस्ताव मंजूर झाला की हे काम या वर्षभरात होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मॉलमधील पुस्तकाच्या दुकानांप्रमाणे या ग्रंथभांडारामध्येही लोकांनी रेंगाळावे, तिथे लोक रेंगाळले तर ही पुस्तके नेमकी काय आहे याची जाणीव त्यांना होईल आणि त्या अनुषंगाने विक्रीही वाढेल यासाठी हे सरकारी रूप बदलायला हवे ही बाब मुद्रणालयाचे अधिकारीही मान्य करतात. ग्रंथभांडारासाठीची जागा वाढली की लोकांना या ठिकाणी बसायलाही जागा उपलब्ध होऊ शकेल. दरम्यान, ग्रंथभांडारामध्येही एसीची सोय करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळेही पुस्तकांचे आयुष्यही वाढू शकेल. पुस्तकांवरची धूळ झटकण्यासाठी पुरेसे चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपलब्ध नसल्याने त्यासाठी ऑटोमेशन पद्धती, ब्लोअर याचा वापरही करता येईल, असे सांगण्यात येते.
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
एकीकडे भिलारमध्ये पुस्तकांचे गाव देखण्या स्वरूपात आकार घेत असताना दुसरीकडे चर्नी रोड येथील सरकारी मध्यवर्ती मुद्रणालयाच्या ग्रंथभांडाराचे रूपात मात्र फारसा फरक पडलेला नाही. सरकारी ग्रंथभांडाराच्या दर्शनी भागातील पुस्तकांवर फारशी धूळ नसली तरी खालचा साठा तसाच धूळ भरलेल्या अवस्थेत दिसतो. मात्र येत्या वर्षभरात हे रूप पालटण्याची आशा आहे.
मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या संस्था विविध साहित्यिक प्रकल्प राबवतात. या प्रकल्पाच्या माध्यमातून सरकारी मुद्रणालयामध्ये छापली जाणारी पुस्तके या ग्रंथभांडारात उपलब्ध होतात. यामध्ये अनेक दुर्मिळ पुस्तकांचाही समावेश आहे. मात्र ही पुस्तके दुर्लक्षित अवस्थेतच आहेत. पुस्तकांचे दुमडलेले कोपरे, काही पुस्तकांच्या मुखपृष्ठावर कसरीमुळे निर्माण झालेली जाळी, पुस्तकांची पिवळी पडलेली पाने हे या पुस्तकांचे वर्षानुवर्षांचे वास्तव आहे. यासंदर्भात मुद्रणालयातील सरकारी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुस्तकांची काळजी घ्यायला चतुर्थ श्रेणी कामगार वर्ग उपलब्ध नाही, त्यामुळे ही धूळ झटकली जात नाही, असे सांगण्यात येते.
मात्र, हे चित्र बदलण्याची आशा निर्माण झाली आहे. मुद्रणालयाच्या आवारात सध्या जिथे कॅन्टीन आहे ती जागा पुस्तकांच्या प्रदर्शनासाठी वापरण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव सरकार दरबारी आहे, अशी माहिती मुद्रणालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. चर्नी रोड स्टेशनला लागून जे मुद्रणालयाचे दुसरे गेट आहे, तिथपर्यंत ही पुस्तके दर्शनी भागात विस्तृत पद्धतीने मांडण्यात येतील. याचा कच्चा आराखडा तयार आहे. प्रस्ताव मंजूर झाला की हे काम या वर्षभरात होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मॉलमधील पुस्तकाच्या दुकानांप्रमाणे या ग्रंथभांडारामध्येही लोकांनी रेंगाळावे, तिथे लोक रेंगाळले तर ही पुस्तके नेमकी काय आहे याची जाणीव त्यांना होईल आणि त्या अनुषंगाने विक्रीही वाढेल यासाठी हे सरकारी रूप बदलायला हवे ही बाब मुद्रणालयाचे अधिकारीही मान्य करतात. ग्रंथभांडारासाठीची जागा वाढली की लोकांना या ठिकाणी बसायलाही जागा उपलब्ध होऊ शकेल. दरम्यान, ग्रंथभांडारामध्येही एसीची सोय करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळेही पुस्तकांचे आयुष्यही वाढू शकेल. पुस्तकांवरची धूळ झटकण्यासाठी पुरेसे चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपलब्ध नसल्याने त्यासाठी ऑटोमेशन पद्धती, ब्लोअर याचा वापरही करता येईल, असे सांगण्यात येते.