मुंबई
किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेल्या शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला सोमय्या मैदानात रोखण्यासाठी सरकारकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आज रात्री लाँग मार्चचा मुक्काम सोमय्या मैदानात असणार आहे. तेथून सकाळीच हा मोर्चा विधानभवनाकडे कूच करणार आहे. मात्र, त्यापूर्वीच मोर्चा थांबवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर, दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत विधान भवनावर मोर्चा काढणार असल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
नाशिकमधून मंगळवारी ६ मार्च निघालेला किसान सभेच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे. मोर्चात शेतकऱ्यांची असलेली संख्या वाढत असल्याचा दावा मोर्चेकरी करत असून मोर्चाला भाजप वगळता अन्य राजकीय पक्षांनी पाठिंबा व्यक्त केला आहे. हा लाँग मार्च सोमय्या मैदानात रोखण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. मोर्चा सोमय्या मैदानातच अडवण्याचे प्रयत्न सरकारकडून होणार असून परिस्थितीचा अंदाज घेत हा मोर्चा आझाद मैदानाकडे जाण्यास परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दक्षिण मुंबईत हा मोर्चा आल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मोर्चेकरी विधान भवनाकडे जाणार नाहीत यासाठी प्रयत्न सुरू झाले असून पोलीस यंत्रणांनी नियोजन करण्यास सुरूवात केली आहे. आज शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाहूरजवळ आल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी किसान सभेच्या नेत्यांची भेट घेत चर्चा केली. चर्चेत सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्याच बरोबर किसान सभेच्या शिष्टमंडळाला सोमवारी चर्चेचे निमंत्रण दिले. तर, दुसरीकडे चर्चा आणि मोर्चा सुरू राहणार असल्याचे किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी स्पष्ट केले. सरकारने चर्चेसाठी दिलेल्या निमंत्रणाचे स्वागत असून मागण्या मान्य होईपर्यंत विधानसभेला घेराव घालणार असल्याचे नवले यांनी स्पष्ट केले.
दहावीच्या विद्यार्थ्यांची काळजी
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे त्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यास त्रास होऊ नये याचीही काळजी मोर्चेकरी शेतकरी घेणार आहेत. सोमय्या मैदानातून हा मोर्चा सकाळी १०.३० वाजल्यानंतर निघणार असल्याची माहिती किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. या वेळेपर्यंत परीक्षार्थी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचले असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोर्चामुळे त्रास होणार नाही.
मोर्चासाठी पालिकेच्या सुविधा
मोर्चेकऱ्यांसाठी पालिकेतर्फे आझाद मैदान परिसरात सोमवारी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ४० फिरती शौचालये, चार पाण्याचे टँकर, आझाद मैदान व मंत्रालय परिसरातील सर्व सशुल्क शौचालये दोन दिवस मोफत ठेवण्यात येणार आहेत. आझाद मैदानात रुग्णवाहिका तैनात केली असून स्वच्छतेसाठी आझाद मैदान परिसरात अतिरिक्त सफाई कामगार ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती पालिकेच्या ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेल्या शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला सोमय्या मैदानात रोखण्यासाठी सरकारकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आज रात्री लाँग मार्चचा मुक्काम सोमय्या मैदानात असणार आहे. तेथून सकाळीच हा मोर्चा विधानभवनाकडे कूच करणार आहे. मात्र, त्यापूर्वीच मोर्चा थांबवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर, दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत विधान भवनावर मोर्चा काढणार असल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
दहावीच्या विद्यार्थ्यांची काळजी
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे त्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यास त्रास होऊ नये याचीही काळजी मोर्चेकरी शेतकरी घेणार आहेत. सोमय्या मैदानातून हा मोर्चा सकाळी १०.३० वाजल्यानंतर निघणार असल्याची माहिती किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. या वेळेपर्यंत परीक्षार्थी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचले असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोर्चामुळे त्रास होणार नाही.
मोर्चासाठी पालिकेच्या सुविधा
मोर्चेकऱ्यांसाठी पालिकेतर्फे आझाद मैदान परिसरात सोमवारी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ४० फिरती शौचालये, चार पाण्याचे टँकर, आझाद मैदान व मंत्रालय परिसरातील सर्व सशुल्क शौचालये दोन दिवस मोफत ठेवण्यात येणार आहेत. आझाद मैदानात रुग्णवाहिका तैनात केली असून स्वच्छतेसाठी आझाद मैदान परिसरात अतिरिक्त सफाई कामगार ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती पालिकेच्या ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.