-साथीच्या आजारांचे मॅपिंग करण्यासाठी हवामानाचा कल आवश्यक
-त्याआधारे आरोग्य विभागाला पूर्वतयारी करणे जाते सोपे
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
हवामानाचे सातत्याने बदलणारे चक्र लक्षात घेतले तर त्यानुसार सर्वसामान्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच आरोग्य आणि हवामान विभागाने एकत्रित काम करण्याची गरज असल्याचे वारंवार बोलून दाखवले जाते. सन २०१७मध्ये असा उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने दोन्ही विभागांकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र, या प्रकल्पास अद्याप अंतिम स्वरूप मिळालेले नाही.
यंदा १ जुलै रोजी झालेली अतिवृष्टी, मध्येच आलेला उष्मा, बदलापूर येथे अनेक तास पाण्यामध्ये अडकून राहिलेले लोक, हवेतील वाढती आर्द्रता, शहराच्या काही भागांमध्ये झोडपून काढणारा पाऊस, अशा हवामानाच्या विविध तऱ्हांवर साथीच्या आजारांचा जोर ठरत असतो. या आजारांचे मॅपिंग करण्यासाठी पावसाचा आणि हवामानाचा कल कळला तर त्याआधारे आरोग्य विभागाला पूर्वतयारी करणे सोपे जाते. पाश्चात्य देशांमध्ये या प्रकारचा अभ्यास करून आरोग्य यंत्रणेला बळकटी दिली जाते, त्यामुळे अशा प्रकारचा प्रलंबित असणारा हा अभ्यास देशाच्या सर्वात श्रीमंत महापालिकेमध्ये प्रत्यक्षात केव्हा येणार, याकडे वैद्यकीय तज्ज्ञांसह सर्वसामान्यांचेही लक्ष लागले आहे.
कीटकजन्य संसर्गित आजारांचा प्रादुर्भाव हा पावसाळ्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात होतो. हवामानातील आर्द्रता, पावसाचे प्रमाण यावरही डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लूसारख्या आजारांची तीव्रता ठरते. प्रत्येक वर्षी ती वेगवेगळी असते. उष्म्याचे प्रमाण वाढले की काही साथींचा जोर ओसरतो तर काही संसर्गजन्य आजार हे अधिक सक्रिय होतात. त्यामुळे प्रत्येक वर्षी पडणाऱ्या पावसाचा कल लक्षात घेतला तर वैद्यकीय पूर्वतयारी करणे सोपे होणार आहे.
आर्द्रता, पावसाळा आणि उष्म्याप्रमाणे वाऱ्याचा वेगही मलेरियाची साथ पसरवणाऱ्या डासांचा प्रभाव ठरवण्यासाठी कारणीभूत असतो. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या दिशेवरही मलेरियासारख्या आजारांचा संसर्ग किती वेगाने होऊ शकतो, याचाही अभ्यास मांडला जाऊ शकतो. त्यामुळे या दोन्ही विभागांनी संयुक्तरित्या अभ्यास करण्याची गरज अधोरेखित केली जात आहे.
'हवामान विभागाच्या माहितीकडे लोकांनी डोळसपणे पाहण्याची गरज आहे. कारण, लोकांचे आरोग्य, व्यवसाय आणि देशाचे अर्थकारण हे हवामानावर अवलंबून आहे. दीड वर्षापूर्वी या प्रकल्पाच्या आखणीसंदर्भात बैठका घेण्यात आल्या होत्या, मात्र अद्याप तो पूर्णत्वास गेला नाही. मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून पावसाची तसेच हवामानाची माहितीही वेळोवेळी दिली जाते. त्यानुसार रुग्णालयामध्ये आपत्कालीन वैद्यकीय आराखडा तयार करून त्यानुसार रुग्णसेवा दिली जाते', असे पालिकेचे आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील धामणे यांनी सांगितले.
हवेतून पसरणाऱ्या आजारांचाही माग
'सफर'च्या माध्यमातून हवेमध्ये असलेल्या कार्बन, नायट्रोजन, सल्फर आधी घटकांचे प्रमाण देण्याची सुविधा हवामान खात्याने उपलब्ध करून दिली आहे. या प्रदूषित घटकांच्या अभ्यासावरून हवेची गुणवत्ताही ठरते. शहराच्या कोणत्या भागामध्ये हवेतून होणारे प्रदूषण किती आहे याचा आलेख मांडला जातो. त्याचा उपयोग आरोग्य विभागालाही निश्चितपणे होतो, असे पालिकेच्या आरोग्य खात्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या हवेतील गुणवत्तेवर दमा, श्वसनमार्गाचे विकार, तसेच हृदयविकारासारख्या आजारांची तीव्रता ठरते.