अ‍ॅपशहर

इतिहास रचणाऱ्यांचा उलगडला इतिहास

स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा निर्धार आणि त्याला कष्टाची जोड मिळाली की घडतो तो इतिहास. आपल्या आजूबाजूला असा इतिहास घडवणाऱ्या काही व्यक्ती असतात. मात्र, त्यांची ओळख आपल्यापर्यंत पोहोचत नाही. ‘अमृतयात्रा’ संस्थेच्या माध्यमातून अशा वेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या सहा व्यक्तींची धडपड रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये आयोजित ‘स्वयं’ या कार्यक्रमात करून देण्यात आली.

Maharashtra Times 23 Jan 2017, 4:00 am
‘स्वयं’प्रेरणेने वेगळी वाट निवडणाऱ्यांची जगाला ओळख
महाराष्ट्र टाइम्स.कॉम history unfold who created history
इतिहास रचणाऱ्यांचा उलगडला इतिहास


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा निर्धार आणि त्याला कष्टाची जोड मिळाली की घडतो तो इतिहास. आपल्या आजूबाजूला असा इतिहास घडवणाऱ्या काही व्यक्ती असतात. मात्र, त्यांची ओळख आपल्यापर्यंत पोहोचत नाही. ‘अमृतयात्रा’ संस्थेच्या माध्यमातून अशा वेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या सहा व्यक्तींची धडपड रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये आयोजित ‘स्वयं’ या कार्यक्रमात करून देण्यात आली.

या सहाही व्यक्तींनी शिक्षण, शेती, कला, महिला आरोग्य, पर्यावरण आणि देशी अन्नपदार्थांची निर्यात अशा विविध क्षेत्रात आपले पाय भक्कमपणे रोवले आहेत. त्यांच्या प्रवासाची ओळख ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी गप्पांच्या माध्यमातून करून दिली. ‘महाराष्ट्र टाइम्स’ या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर होता.

डॉक्टर वडील असलेल्या यजुर्वेंद्र महाजन यांनी वयाच्या २५व्या वर्षी मिळालेले सामान्य जगणे नाकारत नव्या प्रवासाला सुरुवात केली. ग्रामीण भागातील वंचित, अपंग, दृष्ट‌हिीन मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडत त्यांनाही उच्च पदांपर्यंत पोहोचण्याचा अधिकार आणि मार्ग महाजन यांनी दाखवला. दीपस्तंभ फाऊंडेशनच्या माध्यमातून सध्या सात विविध प्रकल्पांवर त्यांचे काम सुरू आहे. महाजन यांनी यावेळी बोलताना आपल्या देशातील शिक्षण आणि शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली. दीपस्तंभच्या या प्रकल्पांसाठी दरवर्षी सात ते आठ लाख रुपयांचे कर्ज काढावे लागते. त्यामुळे या प्रकल्पांबद्दल शहरी भागांमधून विचारणा आणि मदत व्हावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमात उपस्थितांनी ज्ञानेश्वर बोडके यांनाही भरभरून दाद दिली. बोडके यांनी शेतकऱ्यांना नवी दिशा दिली आहे. शेतीमध्ये आधुनिक प्रयोग करून त्यांनी सेंद्रीय भाज्या गरजूंपर्यंत पोहोचवल्या आहेत. एक एकर शेतीमध्ये गुंतवणूक केली आणि दररोज दोन तास मेहनत केली तर महिन्याला ५० हजार रुपयांचे उत्पन्न घेता येऊ शकते, असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. साध्यासोप्या शब्दांमध्ये त्यांनी शेतीचे तंत्र आणि उपयुक्तता उपस्थितांपर्यंत पोहोचवली.

या गप्पांची सुरुवात पर्यावरणस्नेही सॅनिटरी नॅपकीनचे उत्पादन आणि सॅनिटरी नॅपकिनचे महत्त्व महिलांपर्यंत पोहोवणाऱ्या स्वाती बेडेकर यांच्याशी गप्पांनी झाली. बडोदा येथे विज्ञान प्रसारक म्हणून काम करताना त्यांना महिला आणि मुलींचे प्रश्न समजले. त्यावेळी नऊ-दहा वर्षांच्या मुलींचे शिक्षण बंद होण्याचे कारण समजल्यावर त्यांनी सॅनिटरी नॅपकिन्सची निर्मिती करण्याचा निश्चय केला. केळ्याच्या झाडाच्या धाग्यांचा वापर केलेले हे नॅपकिन्स महिलाच बनवतात आणि हे नॅपकिन्स पार परदेशातही जातात.

हॉटेल व्यवसाय सोडून आधुनिक कुंभार बनून त्यातून कलाप्रचार करणाऱ्या रायगडमधील राजेश कुळकर्णी यांनी माती हे अभिव्यक्तीचे साधन कसे बनले हे सांगितले. हॉटेल व्यवसायामधील अनैतिकता जाणवल्यावर सुरुवातील कमी उत्पन्न देणाऱ्या मातीशी संबंध जुळल्याशी माहिती त्यांनी दिली. हत्तींशी संवाद साधणारे आनंद शिंदे यांनीही यावेळी प्रेक्षकांना छायाचित्रकारापासून हत्तींशी झालेल्या मैत्रीचा थक्क करणारा प्रवास उलगडून सांगितला. सध्या दर १५ मिनिटाला हत्तीचा मृत्यू होत असून हे थांबवले नाही तर २०२५ हे हत्तींचे शेवटचे वर्ष असेल, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. वेगळ्या वाटा निवडणाऱ्यांमध्ये भारतीय खाद्यपदार्थांची परदेशी फ्रोझन फूड पद्धतीने निर्यात करण्याचे स्वप्न बाळगलेल्या सुरेखा शिंदे यांनीही त्यांचे यशापयश उलगडून दाखवले. त्यांचे पदार्थ आज जगातील सहा विविध देशांमध्ये जातात. त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, कधी पदरात पडलेली निराशा, त्यातून घेतलेला धडा याची ओळख करून देत उपस्थित प्रेक्षकांना नवे प्रोत्साहन दिले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज