म. टा. प्रतिनिधी, मुंबई
दिवसागणिक वाढणारी लोकल आणि रेल्वे स्थानकातील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वे सुरक्षा बलाकडून (आरपीएफ) प्रयोगात्मक उपाययोजना राबवण्यात येणार आहे. महिना अखेरीस मध्य रेल्वेवरील 'आरपीएफ'मध्ये तब्बल २०० होमगार्ड तैनात होणार असून, मुंबई रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकांवर नियोजनासाठी, पादचारी पुलांवरील गर्दी, स्थानकातील प्रवेश आणि बाहेर पडणाऱ्या गेटवर प्रवाशांना सूचना देण्यासाठी त्यांची मदत घेण्याचा 'आरपीएफ'चा प्रयत्न आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह भायखळा, दादर, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, दिवा, वडाळा रोड, कुर्ला, अंधेरी ही स्थानके गर्दीची स्थानके म्हणून ओळखली जातात. स्थानकातील सुरक्षेसह प्रवाशांच्या गर्दी नियोजनाचे मोठे आव्हान 'आरपीएफ'समोर आहे. सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलिस, महाराष्ट्र सुरक्षा बल अशी व्यवस्था आहे. स्थानकांसह लोकलमधील महिला डब्यातही सायंकाळी पोलिसांचा पहारा असतो. नव्या २०० होमगार्डना गर्दी नियोजनाबाबत सूचना देऊन रेल्वे स्थानकांवर नियुक्त करण्याचे नियोजन असल्याचे मुंबई आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त के. के. अश्रफ यांनी सांगितले.
रेल्वे स्थानकांवर प्रवेश आणि स्थानकाबाहेर पडण्यासाठी विशिष्ट गेट राखीव ठेवण्यात येणार असून, प्रवाशांनी संबंधित गेटचाच वापर करावा, यासाठी सूचना फलकही लावण्यात येणार आहेत. सीएसएमटीवर सध्या याबाबत प्रायोगिक चाचणी सुरू आहे. यशस्वी चाचणीनंतर हा प्रयोग मध्य आणि हार्बर मार्गावरील गर्दीच्या स्थानकांवर राबवण्यात येणार असल्याची माहिती सुरक्षा आयुक्त अश्रफ यांनी दिली. सद्यस्थितीत मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रोज सुमारे १७७२ लोकल फेऱ्यांद्वारे ४५ लाख प्रवाशांची वाहतूक होते. सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या काळात लोकल क्षमतेपेक्षा तिप्पट प्रवासी प्रवास करत असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.
महिला, विद्यार्थ्यांना सुरक्षेचे धडे
दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर कॉलेजांशी संपर्क साधून एनएसएस आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांचे खास 'विद्यार्थी पथक' स्थापन करण्यात येणार आहे. महिला प्रवासी संघटनांना सोबत घेऊन दामिनी पथकाची नव्याने बांधणी करणार येईल. लोकल किंवा स्थानकात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कोणती काळजी घ्यावी, गर्दी पाहून हतबल न होता कोणत्या सूचना प्रवाशांना द्याव्यात या बाबत विद्यार्थी आणि दामिनी पथकातील सदस्यांना मार्गदर्शन करण्याबाबत पूर्वतयारी सुरू असल्याची माहिती आरपीएफ अधिकाऱ्यांनी दिली.
दिवसागणिक वाढणारी लोकल आणि रेल्वे स्थानकातील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वे सुरक्षा बलाकडून (आरपीएफ) प्रयोगात्मक उपाययोजना राबवण्यात येणार आहे. महिना अखेरीस मध्य रेल्वेवरील 'आरपीएफ'मध्ये तब्बल २०० होमगार्ड तैनात होणार असून, मुंबई रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकांवर नियोजनासाठी, पादचारी पुलांवरील गर्दी, स्थानकातील प्रवेश आणि बाहेर पडणाऱ्या गेटवर प्रवाशांना सूचना देण्यासाठी त्यांची मदत घेण्याचा 'आरपीएफ'चा प्रयत्न आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह भायखळा, दादर, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, दिवा, वडाळा रोड, कुर्ला, अंधेरी ही स्थानके गर्दीची स्थानके म्हणून ओळखली जातात. स्थानकातील सुरक्षेसह प्रवाशांच्या गर्दी नियोजनाचे मोठे आव्हान 'आरपीएफ'समोर आहे. सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलिस, महाराष्ट्र सुरक्षा बल अशी व्यवस्था आहे. स्थानकांसह लोकलमधील महिला डब्यातही सायंकाळी पोलिसांचा पहारा असतो. नव्या २०० होमगार्डना गर्दी नियोजनाबाबत सूचना देऊन रेल्वे स्थानकांवर नियुक्त करण्याचे नियोजन असल्याचे मुंबई आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त के. के. अश्रफ यांनी सांगितले.
रेल्वे स्थानकांवर प्रवेश आणि स्थानकाबाहेर पडण्यासाठी विशिष्ट गेट राखीव ठेवण्यात येणार असून, प्रवाशांनी संबंधित गेटचाच वापर करावा, यासाठी सूचना फलकही लावण्यात येणार आहेत. सीएसएमटीवर सध्या याबाबत प्रायोगिक चाचणी सुरू आहे. यशस्वी चाचणीनंतर हा प्रयोग मध्य आणि हार्बर मार्गावरील गर्दीच्या स्थानकांवर राबवण्यात येणार असल्याची माहिती सुरक्षा आयुक्त अश्रफ यांनी दिली. सद्यस्थितीत मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रोज सुमारे १७७२ लोकल फेऱ्यांद्वारे ४५ लाख प्रवाशांची वाहतूक होते. सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या काळात लोकल क्षमतेपेक्षा तिप्पट प्रवासी प्रवास करत असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.
महिला, विद्यार्थ्यांना सुरक्षेचे धडे
दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर कॉलेजांशी संपर्क साधून एनएसएस आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांचे खास 'विद्यार्थी पथक' स्थापन करण्यात येणार आहे. महिला प्रवासी संघटनांना सोबत घेऊन दामिनी पथकाची नव्याने बांधणी करणार येईल. लोकल किंवा स्थानकात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कोणती काळजी घ्यावी, गर्दी पाहून हतबल न होता कोणत्या सूचना प्रवाशांना द्याव्यात या बाबत विद्यार्थी आणि दामिनी पथकातील सदस्यांना मार्गदर्शन करण्याबाबत पूर्वतयारी सुरू असल्याची माहिती आरपीएफ अधिकाऱ्यांनी दिली.