वाचन कार्यशाळेमध्ये पालकांनी गिरवले नवे धडे
मटा मीडिया पार्टनर
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
मुले वाचत नाहीत अशी आजच्या पालकांपैकी अनेकांची तक्रार असते. त्यामुळे मुलांनी वाचावे यासाठी पालक नेमकी काय भूमिका घेतात, पालक काय करतात, पालक काय वाचतात याबद्दल पालकांमध्ये जाणीवजागृती निर्माण करणारी कार्यशाळा अलीकडेच गोरेगाव येथील अ. भि. गोरेगावकर शाळेमध्ये ज्योत्स्ना प्रकाशनच्या 'वाचू आनंदे' या उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आली होती. 'महाराष्ट्र टाइम्स' या उपक्रमाचा मीडिया पार्टनर होता.
शिक्षणक्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या प्रयोगशील आणि अनुभवी शलाका देशमुख आणि वीणा तांबे यांनी यावेळी पालकांना मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी मुलांच्या आई-बाबांनी तर उपस्थिती लावलीच मात्र आजी-आजोबा आणि शिक्षकांनीही उपस्थिती लावली. यावेळी देशमुख आणि तांबे यांनी पालकांना काही पुस्तके वाचून दाखवली. त्यांच्याकडून वाचन करूनही घेतले. पालकांसमोर पुस्तके ठेवल्यावर हे पालक नेमके कोणते निकष लावून पुस्तके निवडतात त्याचे निरीक्षण करून त्याबद्दलही चर्चा करण्यात आली
यासंदर्भात बोलताना तांबे यांनी सांगितले की, केवळ वाच असे सांगून मुले वाचणार नाहीत. त्यासाठी घरात वाचनाचे वातावरण दिसते का, हे महत्त्वाचे आहे. मुलांना लहानपणापासूनच वाचून दाखवायला पाहिजे, त्यांना पुस्तके हाताळायला दिली पाहिजेत. पुस्तक निवड करताना मुलांना ती निवडायला देणे हे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले. आपली आवड मुलांवर थोपवू नये. पुस्तक वाचून दाखवताना त्यांना चित्रे, नकाशे, अॅटलास शब्दकोश यांच्या मदतीने संदर्भ समजावणेही गरजेचे असते. तसेच प्रत्येक पुस्तक हे ज्ञान, माहिती, अभ्यासात मदत म्हणून वाचले जाऊ नये. केवळ वाचनाचा आनंद या दृष्टीकोनातून पुस्तकाकडे पाहिले जाणे महत्त्वाचे असते, असेही या कार्यशाळेमध्ये स्पष्ट करण्यात आले.
याच जोडीला एखादा विद्यार्थी पुस्तक सगळ्या सकारात्मक परिस्थितीनंतरही वाचत नसेल तर ते स्वीकारायला हवे. अनेकदा परिणाम लगेच दिसत नाहीत, ते नंतर जाणवू लागतात. त्यामुळे त्यासाठी पालकांनी संयम बाळगला पाहिजे याचीही जाणीव कार्यशाळेमध्ये करून देण्यात आली. सुमारे ८० पालक, शिक्षक आणि आजी-आजोबांनी या कार्यशाळेमध्ये उपस्थिती लावली. वाढत्या वयातील वाचनाचे टप्पे समजून घेतल्यानंतर, वाचनाचे विविध पैलू जाणून घेतल्यानंतर पुस्तके विकत घेण्यासाठीही पालकांनी खूप गर्दी केली होती.