अ‍ॅपशहर

दहावी परीक्षा घ्यायची कशी?; शिक्षकांपुढे प्रश्नचिन्ह

इयत्ता दहावीसाठी भाषा आणि समाजशास्त्र या दोन विषयांचे २० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन पुन्हा सुरू करून राज्य सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. मात्र, याबाबतचा शासननिर्णय जाहीर होऊन एक महिना उलटूनही त्याच्या अंमलबजावणीसाठी कोणतेही परिपत्रक राज्य राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अद्याप आलेले नाही. त्यामुळे परीक्षा नेमकी घ्यायची कशी, असा पेच शिक्षकांपुढे पडला आहे.

Maharashtra Times 11 Sep 2019, 2:49 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः इयत्ता दहावीसाठी भाषा आणि समाजशास्त्र या दोन विषयांचे २० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन पुन्हा सुरू करून राज्य सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. मात्र, याबाबतचा शासननिर्णय जाहीर होऊन एक महिना उलटूनही त्याच्या अंमलबजावणीसाठी कोणतेही परिपत्रक राज्य राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अद्याप आलेले नाही. त्यामुळे परीक्षा नेमकी घ्यायची कशी, असा पेच शिक्षकांपुढे पडला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ssc


इयत्ता दहावीचे अंतर्गत गुण बंद केल्यामुळे नापास विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले. शिवाय हुशार विद्यार्थ्यांचे गुणही कमी झाले. यावरून सरकारवर टीका झाली. यानंतर सरकारने एका समितीमार्फत अंतर्गत मूल्यमापनाचा पुन्हा आढावा घेतला. समितीच्या शिफारशींनुसार नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा २० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन सुरू करण्यात आले. यामुळे शैक्षणिक वर्ष २०१९-२०पासून भाषा आणि सामाजिक शास्त्रे या विषयांसाठीच्या लेखी परीक्षेला ८० गुण व अंतर्गत मूल्यमापनासाठी २० गुण देण्याचा निर्णय झाला. याबाबतची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे देण्यात आली आहे. मात्र, हा निर्णय जाहीर होऊन आता एक महिना उलटून गेला, तरी विषयनिहाय परीक्षेची रचना कशी असेल, याबाबतचा तपशील अद्याप जाहीर झालेला नाही. यामुळे सहामाही परीक्षा आली, तरी शिक्षकांना याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही.

नुकतीच या संदर्भात मंडळात अभ्यास मंडळांची बैठक पार पडली आहे. तसेच समितीने त्यांचा अहवालही सादर केला आहे, असे सूत्रांकडून समजते. मात्र असे असले, तरी अद्याप मंडळाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यामुळे शिक्षक अद्याप या सर्व बाबतीत अनभिज्ञ आहेत.

शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा घ्यायच्या आहेत. याचबरोबर आता सहामाही परीक्षाही आली आहे. यामुळे प्रश्नपत्रिका कशी तयार करायची, हा प्रश्न त्यांच्यासमोर आला आहे. शासन निर्णय जाहीर होऊन एक महिना उलटून गेला, तरी याबाबतच्या अंमलबजावणीचे परिपत्रक अद्याप का आले नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. यामध्ये पाठ्यपुस्तक निर्मिती प्रक्रियेत असलेल्यांना यात सहभागी करून घेतले नाही, यामुळे हा गोंधळ उडाल्याचे बोलले जात आहे.

येत्या आठवड्यात तपशिल जाहीर

या संदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच ती पूर्ण होईल आणि येत्या आठवड्याभरात विषयनिहाय मूल्यांकन पद्धती कशी असेल, याबाबतचा तपशील जाहीर होईल, असे शालेय शिक्षणमंत्री अॅड. आशीष शेलार यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज