अ‍ॅपशहर

रसिकांनी अनुभवली संगीत समाधी

कधी तंबोऱ्याचे भावगर्भ स्वर, तर कुठे संतूर अन् बासरीचे... कधी तबल्याचा नाद घुमला, तर कधी वीणा, सरोद आणि सतारीचे सुमधुर स्वर उमटले... शनिवारपासून सलग तीन दिवस देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शास्त्रीय संगीताच्या उपासकांनी मुंबईकर रसिकांना एका अनोख्या संगीत समाधीचा अनुभव दिला. या वेगाने धावणाऱ्या जगात शास्त्रीय संगीतापासून रसिक तुटत आहेत, अशी भीती वारंवार व्यक्त होत असताना हृदयेश फेस्टिव्हलच्या मैफलीदरम्यान या वाद्यांमधून निघणारे सूर, आलाप, सरगम यामध्ये रसिक आकंठ बुडाले होते.

Maharashtra Times 16 Jan 2018, 4:41 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hridayesh arts festival
रसिकांनी अनुभवली संगीत समाधी


कधी तंबोऱ्याचे भावगर्भ स्वर, तर कुठे संतूर अन् बासरीचे... कधी तबल्याचा नाद घुमला, तर कधी वीणा, सरोद आणि सतारीचे सुमधुर स्वर उमटले... शनिवारपासून सलग तीन दिवस देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शास्त्रीय संगीताच्या उपासकांनी मुंबईकर रसिकांना एका अनोख्या संगीत समाधीचा अनुभव दिला. या वेगाने धावणाऱ्या जगात शास्त्रीय संगीतापासून रसिक तुटत आहेत, अशी भीती वारंवार व्यक्त होत असताना हृदयेश फेस्टिव्हलच्या मैफलीदरम्यान या वाद्यांमधून निघणारे सूर, आलाप, सरगम यामध्ये रसिक आकंठ बुडाले होते.

हृदयेश आर्टस् आयोजित हृदयेश महोत्सवाच्या २८व्या वर्षानिमित्त या चार सत्रांच्या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन पार्ले टिळक विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. ‘महाराष्ट्र टाइम्स क्लचर क्लब’ याचा मीडिया पार्टनर होता. या महोत्सवाला रसिकांनी तिन्ही दिवस मोठ्या संख्येने गर्दी केली. रविवारी मकरसंक्रातीनिमित्त हा कार्यक्रम दोन सत्रांमध्ये पार पडला. मुकुल शिवपुत्र यांनी संक्रात सकाळ अधिक मधुर केली, तर पं. विश्वमोहन भट्ट यांनी मोहनवीणा वादनाने सांगीतिक माहोल अधिक रंगवला.

सोमवारची संध्याकाळ रसिकांसाठी खऱ्या अर्थाने अनोखी ठरली. ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे संतूरवादन समारोपाच्या सत्रात शांत होत जाणाऱ्या संध्याकाळी उपस्थितांनी अनुभवले. त्या वादनातील जादू रसिकांना एका वेगळ्याच जगामध्ये घेऊन गेली. या संध्याकाळची सुरुवात युवा शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या गायनाने झाली. रसिकांनी त्यांच्या गायकीला भरभरून दाद दिली. हाच धागा पं. जयतीर्थ मेवुंडी यांनी पुढे नेत रसिकांना आपल्या स्वरांमध्ये भिजवले. मात्र मध्यंतरानंतर शब्द आणि आलाप संपून मग केवळ संतूरचे सूर निनादत राहिले. व्यासपीठावर पं. शर्मा यांच्या बोटांमधून संतूर वाजत होती आणि या सुरांनी अनोख्या सांगीतिक जगाची ओळख रसिकांना करून दिली. पं. शर्मा यांना ज्येष्ठ तबलावादक पं. योगेश सम्सी यांनी आणि पं. शर्मा यांचे शिष्य ताकाहिरो आराई यांनी वाद्यसाथ केली.

सोमवारच्या सांगता सत्राची सुरुवात अत्यंत उत्साहात झाली. युवा गायिका कौशिकी चक्रवर्ती आणि पं. राकेश चौरसिया यांच्या अनोख्या जुगलबंदीने रसिकांना तृप्त केले. या मैफलीच्या सुरुवात राग भीमपलासीने सुरुवात करून शेवट त्यांनी हंसवर्धिनीमधील वातापि भजे या रचनेने केला. आलाप, बासरीचे सूर आणि तबल्याचा ठेका अशी त्रिधारा यावेळी रसिकांनी अनुभवली. त्यांना तबल्यावर पं. सत्यजीत तळवलकर आणि हार्मोनियमवर अजय जोगळेकर यांनी साथ दिली. या सादरीकरणानंतर पं. जयतीर्थ मेवुंडी यांनी मैफलीचा ताबा घेतला. घडी ये भिनत जात आणि कान्हा रे... कंठ बनी मोतियन की माला या रचना त्यांनी सादर केल्या. त्यांना तबल्यावर ओजस अढिया आणि हार्मोनियमवर हरीप्रिया पाटील यांनी वाद्यसाथ दिली. या निमित्ताने मुंबईमध्ये अशा शास्त्रीय संगीताच्या मैफली आणि महोत्सव अधिक प्रमाणात व्हायला हवेत, अशी भावना रसिकांनीही व्यक्त केली.
तो काळ वेगळा होता...

पं. शिवकुमार शर्मा यांचा वयाची ८० वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने सोमवारी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना पं. शर्मा यांनी तेव्हाचा काळ वेगळा होता आणि आताचा वेगळा आहे असे सांगत तेव्हा कार्यक्रमांना एवढी गर्दी व्हायची नाही, सांगत रसिकांना अशा कार्यक्रमांना अधिक संख्यने उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. पूर्वी असे कार्यक्रम व्हायचे तेव्हा महोत्सवातील इतर कलाकार समोर बसलेले असायचे. आत्ता आहे तसे या, कार्यक्रम सादर करा आणि निघून जा, अशी परिस्थिती नसायची. त्यामुळे तेव्हा दिग्गजांसमोर कला सादर करणे अधिक कठीण होते, अशीही भावना त्यांनी आपल्या मनोगतात उलगडली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज