- आरे हे लहानमोठ्या टेकड्यांचे प्रतल
- संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी होते 'बफर झोन'
- आरेत ओशिवरा, मिठी नद्यांचा उगम
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
आरेची दुग्ध उत्पादनासाठी दिलेली जागा अनेक वर्षांपासून विविध प्रकल्पांमुळे आक्रसत असताना, या ठिकाणी प्रस्तावित असलेल्या नव्या प्रकल्पांमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे जाण्याच्या प्राण्यांसाठी निर्माण झालेल्या वाटा (कॉरिडॉर) धोक्यात येण्याची शक्यता आहे. तसेच, नद्यांच्या जलग्रहण क्षेत्रावर परिणाम होऊन पुराचीही भीती आहे, असे आरेसंदर्भात कमला रहेजा विद्यानिधी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अॅण्ड एन्वायर्नमेंटल स्टडीजच्या अहवालावरून समोर आले आहे. हा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. आरेमधील विविध प्रतलांचा या अहवालात अभ्यास करण्यात आला आहे.
आरे हे लहान-मोठ्या टेकड्यांचे प्रतल असून जंगलाचा भाग, नैसर्गिक जैवविविधता, आदिवासी पाडे, त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय इथे आहे. सन १९४०नंतर या भागामध्ये दुग्ध व्यवसायासाठी जागा देण्यात आली, तेव्हा येथे फारसा विकास झालेला नव्हता. यामुळे या परिसराने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी बफर झोनचे काम केले. आरेमधून ओशिवरा आणि मिठी नदीचा उगम होतो. या भागातील टेकड्यांमधून झिरपलेले पाणी या नद्यांना जिवंत ठेवते. सध्या प्रस्तावित असलेला प्रकल्प हा मिठीच्या जलग्रहण क्षेत्रामध्ये आहे. यामुळे जलग्रहण आणि पाणी वाहून जाण्याच्या प्रक्रियेवर विपरित परिणाम होऊ शकतो. या प्रस्तावित प्रकल्पांच्या परिसरामध्ये मिठी नदीला येऊन मिळणारे पाण्याचे प्रवाह आहेत. या भागात बांधकाम झाले, तर मिठीच्या मधल्या टप्प्यात किंवा जिथे ती समुद्राला मिळते त्या भागांमध्ये पुराचा धोका संभवू शकतो, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे जमिनीत जिरपणाऱ्या पाण्यावरही परिणाम होऊ शकतो. डोंगराळ भागातून येणारे पाणी जमिनीत मुरले नाही, तर स्वाभाविकपणे ते जमिनीवरून वाहून परिसर जलमय होण्याची भीती आहे.
रहेजा कॉलेजच्या प्रा. श्वेता वाघ, प्रा. हुसेन इंदोरवाला, प्रा. मीनल येरमशेट्टी, आर्किटेक्ट रेश्मा मॅथ्यू, मिहीर देसाई यांनी हा अहवाल तयार केला असून, त्यासाठी त्यांना भूगोलशास्त्रज्ञ डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, नगररचनाकार शीमा फातिमा आणि पर्यावरणतज्ज्ञ आरे अभ्यासक आनंद पेंढारकर यांची मदत झाली आहे.
आरेमुळे प्राणी-पक्षी सुरक्षित
आरेने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राणी-पक्ष्यांना थेट शहरांच्या सीमेपासून सुरक्षित ठेवले आहे. आरेमधील प्रकल्प ज्या पट्ट्यामध्ये प्रस्तावित आहेत, त्या पट्ट्यामध्ये बांधकाम झाल्यास संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेवरच थेट शहरीकरणाचा धोका निर्माण होणार आहे. जैवविविधतेवरही याचा परिणाम होईल. या भागातून बिबळे आणि इतर प्राण्यांचा वावर आहे. त्यांचा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी असलेला थेट संपर्क तुटण्याची भीती या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. सन १९६४, १९८१च्या विकास आराखड्यांसह नव्या २०३४पर्यंतच्या विकास आराखड्यांची तुलना करून त्याद्वारे आरेची कमी होणारी जमीन दाखवून उरलेल्या हरित क्षेत्राचे कसे नुकसान होत आहे, हे स्पष्ट करण्यात आले आहे.