म. टा. प्रतिनिधी, मुंबई
रायगड किल्ला परिसर आणि त्या भागातील गावांना जोडणाऱ्या नवीन रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनाची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगाच्या माध्यमातून सामाजिक वनीकरण विभागामार्फत हाती घेतली जाणार असल्याची माहिती रोजगार हमी योजनामंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.
राज्य शासनाच्या रोहयो विभागामार्फत रायगडचे जिल्हाधिकारी तसेच कोकण विभागीय आयुक्तांनाही याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. या कामाच्या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच रायगड किल्ला परिसरातील रस्त्यांचे सुशोभीकरण होण्यास मदत होईल, असे रावल यांनी यासंदर्भात मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत सांगितले.
रोहयोतून सध्या विविध स्वरूपाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यातून राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे. राज्यातील किल्ल्यांची स्वच्छता, संवर्धन करण्याचे कामही आता रोहयो योजनेतून करण्यात येईल. त्यातून किल्ले संवर्धनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. किल्ले परिसरात वृक्ष लागवड करणे, रस्त्यांचे सुभोभिकरण करणे, जलसाठ्यांचे संवर्धन करणे, आदी कामे हाती घेण्यात येत आहेत. रायगड विकास प्राधिकरणाच्या समन्वयाने जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्षारोपण व संगोपनाच्या कामाचे नियोजन करून त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देशही रावल यांनी दिले आहेत.