अ‍ॅपशहर

पाकिस्तानच्या तुरुंगात ५५८ भारतीय मच्छिमार करोनाछायेत; शिक्षा पूर्ण होऊनही सुटका नाही

तुरुंगातील बंदिस्त कैद्यांना करोनासंसर्गाचा सर्वाधिक धोका असताना वारंवार विनंती करूनही शिक्षेचा कालावधी पूर्ण केलेल्या पाकिस्तानच्या तुरुंगातील मच्छिमारांची सुटका अद्यापही झालेली नाही.

Authored byप्रगती बाणखेले | महाराष्ट्र टाइम्स 12 Jul 2021, 8:08 am
मुंबई : तुरुंगातील बंदिस्त कैद्यांना करोनासंसर्गाचा सर्वाधिक धोका असताना वारंवार विनंती करूनही शिक्षेचा कालावधी पूर्ण केलेल्या पाकिस्तानच्या तुरुंगातील मच्छिमारांची सुटका अद्यापही झालेली नाही. करोना साथीत गेले दीड वर्ष या मच्छिमारांशी काहीही संपर्क नसून त्यांचे कुटुंबीय अत्यंत चिंतेत आहेत. भारत आणि पाकिस्तान सरकारने या मच्छिमारांचा मानवतेच्या दृष्टीने विचार करून त्यांची मुक्तता करावी, अशी कळकळीची विनंती पोरबंदर येथील मच्छिमारांचे नेते जीवनभाई जुनगी यांनी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम पाकिस्तानच्या तुरुंगात ५५८ भारतीय मच्छिमार करोनाछायेत; शिक्षा पूर्ण होऊनही सुटका नाही


भारत आणि पाकिस्तानदरम्यान असलेल्या अरबी समुद्रात मासेमारी करताना चुकून सागरी सीमा ओलांडून गेलेल्या मच्छिमारांना संबंधित देशांच्या तटरक्षक दलांकडून बेकायदा घुसखोरीच्या आरोपाखाली पकडून तुरुंगात डांबले जाते. खटले चालवून त्यांना शिक्षा होतात. या महिन्याच्या १ तारखेला भारत आणि पाकिस्तानमधील करारानुसार एकमेकांच्या तुरुंगात असलेल्या कैद्यांची यादी हस्तांतरित करण्यात आली. त्यानुसार ५५८ भारतीय मच्छिमार पाकिस्तानच्या तुरुंगात असून ७४ पाकिस्तानी मच्छिमार भारताच्या ताब्यात आहेत. पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या तब्बल ३०० मच्छिमारांनी त्यांची शिक्षा पूर्ण केली आहे. त्यांचे राष्ट्रीयत्व सिद्ध करणारी कागदपत्रेही भारताकडून सादर करण्यात आलेली आहेत. तरीही त्यांची सुटका झालेली नाही.

ऐन करोना संसर्गाच्या काळात कैद्यांना तुरुंगात धोक्याच्या छायेखाली राहावे लागत असल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. त्यांच्या आरोग्याबाबत काहीही कळवण्यात आलेले नाही. कैद्यांकडूनही या काळात काहीही खबर आलेली नाही. दोन्ही देशांनी एकमेकांच्या तुरुंगांत वैद्यकीय पथक पाठवून या कैद्यांच्या प्रकृतीची तपासणी करावी, असेही कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

दरम्यान, मच्छिमारांशिवाय भारताचे ५१ अन्य नागरिक पाकिस्तानच्या बंदिवासात असून २७१ पाक नागरिक भारताच्या तुरुंगांत आहेत.

मृत्यूनंतरही फरफट


तुरुंगांत दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सुविधा अत्यंत अपुऱ्या असल्याने अनेक आजारी मच्छिमारांचा तुरुंगातच मृत्यू होतो. दोन्ही देशांतील तणावपूर्ण संबंधांमुळे मृतदेह ताब्यात मिळण्यासाठीही मोठी प्रतीक्षा करावी लागते. २६ मार्चला कराचीच्या तुरुंगात मरण पावलेल्या ३६ वर्षीय रमेश तबा सोसा या मच्छिमाराचा मृतदेह तब्बल ४२ दिवसांनी नातेवाईकांना मिळाला होता.

१२०० बोटीही पाकिस्तानकडे


केवळ मच्छिमारच नव्हे तर त्यांच्या बोटीही पकडल्या जातात. एक बोट बांधायला किमान ५० लाख रुपये खर्च येतो. अशा १२०० बोटी पाकिस्तानच्या ताब्यात असून अनेक वर्षे पडून राहिल्याने लाकूड कुजून बहुतांश बोटी खराब झाल्या आहेत. त्यापैकी २०० बोटी अद्यापही बऱ्या अवस्थेत असून दुरुस्त करून वापरण्यासारख्या आहेत.

संवाद प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी पाकिस्तानने ताबडतोब चार निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक संयुक्त न्यायिक समितीवर करावी. २००७मध्ये दोन्ही देशांनी मिळून ही समिती तयार केली होती. ती ऑक्टोबर, २०१३पर्यंत कार्यरत होती. २०१८मध्ये दोन्ही देशांनी या समितीचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरवले. भारताने चार सदस्यांची नेमणूक केली आहे. आता पाकिस्तानने तातडीने त्यांच्या सदस्याची नेमणूक करून पुढील बैठकीचे आयोजन करावे.

- जतीन देसाई, पाकिस्तान इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रसी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज