म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
कुलाबा वांद्रे मेट्रो ३ प्रकल्पातील आणखी एक प्रश्न निकालात काढण्यात मेट्रो रेल कॉर्पोरेशनला यश आले आहे. चिराबाजार येथील मासेविक्रेत्यांना दरमहा भाड्यापोटी विशिष्ट रक्कम देण्यावर कॉर्पोरेशन व विक्रेत्यांमध्ये एकमत झाले. त्यानंतर प्रकल्पाच्या मार्गातील अडथळा असणारे मासळी बाजार तोडण्यात आला.
सदर मार्केट प्रकल्प मार्गात येत होता. हे मार्केट तोडून ५०० मीटर अंतरावर नवे मार्केट कॉर्पोरेशनने बांधले आहे. विक्रेत्यांनी या मार्केटमध्ये स्थलांतर करावे असा, कॉर्पोरेशनचा प्रयत्न होता. परंतु स्थलांतरामुळे आमच्या धंद्यावर परिणाम होईल, असा आक्षेप घेत विक्रेत्यांनी नव्या मार्केटमध्ये जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे विक्रेत्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न कॉर्पोरेशनच्या वतीने सुरू होते.
कॉर्पोरेशनने विक्रेत्यांना प्रशस्त इमारत बांधून दिली आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा मूळ जागीच नवी जागा दिली जाणार आहे. त्यासाठी त्यांनी प्रकल्पाचे काम पूर्ण होईपर्यत नव्या जागेत तात्पुरते स्थलांतरित व्हावे असा कॉर्पोरेशनचा आग्रह होता. परंतु विक्रेत्यांचा नकार कायम होता.
या प्रश्नी मार्ग काढण्यासाठी मेट्रोचे अधिकारी वाटाघाटी करत होतेच शिवाय खुद्द कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे याही मासे विक्रेत्या महिलांशी संवाद साधत होत्या. नव्या जागेत जायचे नसेल तर जुनी जागा सोडण्याच्या मोबदल्यात दर महिन्याला भाडे देण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला. अखेर नव्या जागेत जाण्याऐवजी कॉर्पोरेशनकडून दरमहा भाडे स्वीकारण्याचा पर्याय विक्रेत्यांनी मान्य केला. शिवसेना सचिव व खासदार, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ विक्रेत्यांच्या वतीने वाटाघाटी करत होते. वाटाघाटी यशस्वी झाल्याने सोमवारी जुने मार्केट तोडण्याची कारवाई सुरू झाली. हा प्रश्न सुटल्यान मेट्रो प्रकल्पाला या भागात आणखी गती मिळाली आहे.