म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
'जातीव्यवस्था आता कालबाह्य झाली आहे. धर्मगुरू आणि नेत्यांनी लोकांना हे सांगणे आवश्यक आहे. शिक्षण हे धर्माची मूलतत्त्वे जपून धर्मनिरपेक्षपणे दिले जावे', असे मत बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी बुधवारी व्यक्त केले. 'भारतीय पारंपरिक शिक्षण पद्धती ही अहिंसा, करूणा यावर आधारलेली होती. मूल्याधिष्ठित पिढीची जडणघडण होण्यासाठी भारताने पारंपरिक आणि आधुनिक शिक्षणाचा संगम साधला पाहिजे', असेही ते म्हणाले.
मुंबई विद्याापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाने आयोजित केलेल्या 'द कन्सेप्ट ऑफ मैत्री (मेत्ता) इन बुद्धिजम' या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी दलाई लामा बोलत होते. यावेळी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. सुनील भिरुड, तत्त्वज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. गीता रमणा, प्राध्यापक डॉ. अर्चना मलिक, आयोजन समितीचे सदस्य प्राध्यापक डॉ. संदेश वाघ उपस्थित होते. बौद्ध धर्मातील मैत्री संकल्पनेवर प्रकाश टाकताना दलाई लामा म्हणाले, 'मैत्री, करूणा, आणि प्रेम या तत्त्वांचा अंगीकार करून अनेक समस्यांना उत्तर दिले जाऊ शकते. हाती शस्त्रे घेऊन समस्येचे निराकरण होऊ शकत नाही. शस्त्रांमुळे जगाने मोठी किंमत मोजली आहे. हिंसेला लोक कंटाळले आहेत. धर्माने समाजाला एकत्र आणले पाहिजे. धर्माच्या नावावर विभागणी होणे योग्य नाही. त्यासाठी शिक्षण मानवतेच्या तत्त्वांवर आधारलेले असावे. कालौघात भौतिक घटक हे शिक्षणाचे केंद्रबिंदू झाले. अशावेळी विद्यार्थ्यांना मार्ग दाखवण्यासाठी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांना शहाणपणाची शिकवण मिळाली पाहिजे.'
विद्यापीठाच्या जर्नलचे प्रकाशन
तत्त्वज्ञान विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 'फिलॉसॉफिकल ट्रॅडिशन ऑफ द वर्ल्ड' या जर्नलचे प्रकाशन दलाई लामा यांच्या हस्ते करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये अनेक मान्यवर आणि शिक्षणतज्ज्ञ बौद्धधर्मातील मैत्री या संकल्पेवर त्यांचे विचार मांडणार आहेत.