म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीमध्ये सहा ते सात जणांच्या जमावाने केलेल्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घाटकोपरमध्ये घडली. नीतेश उर्फ बंटी प्रकाश सावंत (३२) असे मृत तरुणाचे नाव असून पंतनगर पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
गौरीशंकर वाडीतील ओमप्रकाश इमारतीमध्ये राहणाऱ्या नीतेश सावंत याचा शनिवारी वाढदिवस होता. रविवारी सर्वांना सुट्टी असल्याने नीतेशने मित्रांसाठी गौरीशंकर वाडीतील साईबाबा मंदिर परिसरात पार्टी ठेवली होती. नीतेश वाढदिवस साजरा करत असल्याची कुणकुण बाबू केंडे याला लागली. याच परिसरात राहणाऱ्या बाबू आणि नीतेश यांच्यामध्ये चार ते पाच दिवसांपूर्वी जोरदार भांडण झाले होते. त्यामुळे बाबूच्या मनात नीतेशबद्दल राग होता आणि त्यातच तो वाढदिवसाची पार्टी करत असल्याचे समजल्यावर तो आणखीन संतापला. रात्री साडेनऊच्या सुमारास बाबू आपल्या संकेत खरात, महेश शिवलकर, प्रसाद गपट, रोहन निकम, कमलेश होले, यश इचले या मित्रांना घेऊन पार्टीत पोहोचला. चाकू आणि दारूच्या बाटलीने सर्वांनी नीतेश याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात रक्तबंबाळ अवस्थेत सोडून या सर्वांनी पळ काढला. स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने जखमी नीतेशला राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
पंतनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. घटनेनंतर पळालेल्या आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून सहा जणांना अटक केली तर बाबू याचा शोध अद्याप सुरू आहे. जुन्या वादाचे कारण या हल्ल्यामागे असले, तरी हा वाद नेमका काय होता हे बाबू याच्या अटकेनंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.