अ‍ॅपशहर

कलाकारांच्या मनमानीमुळे बिघडले संगीत नाटक

संगीत नाटक हे कलाकारांच्या मनमानीमुळे बिघडत गेले. पूर्वी या नाटकासाठी काही निर्बंध होते. मात्र ते निर्बंध मोकळे झाल्यावर कलाकारांची मनमानी वाढली आणि याचा दोष संगीत नाटकांवर आला.

Maharashtra Times 14 Jun 2018, 12:44 am
९८व्या नाट्यसंमेनाध्यक्षा कीर्ती शिलेदार यांची खंत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kirti shiledar speech on sangeet natak
कलाकारांच्या मनमानीमुळे बिघडले संगीत नाटक


anuja.chawathey@timesgroup.com, @anujaacMT, सुधा करमरकर रंगमंच, मुलुंड

संगीत नाटक हे कलाकारांच्या मनमानीमुळे बिघडत गेले. पूर्वी या नाटकासाठी काही निर्बंध होते. मात्र ते निर्बंध मोकळे झाल्यावर कलाकारांची मनमानी वाढली आणि याचा दोष संगीत नाटकांवर आला. संगीत नाटकातील कमी शिकलेल्या कलाकारांना त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देता आले नाही आणि गद्य रंगभूमीवरील रंगकर्मींचा वरचष्मा निर्माण झाला. आता संगीत नाटकाला उभारी देण्यासाठी जिथे संगीत शिकवले जाते, तिथे संगीत नाटक शिकवले जावे, अशी अपेक्षा मुलुंड येथे प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे आयोजित ९८व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केली. संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

संगीत नाटकाकडे आपण गांभीर्याने पाहत नाही, असे सांगत त्यांच्या आई आणि संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार जयमाला शिलेदार यांनीही हाच मुद्दा आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मांडला होता, त्याची आठवण त्यांनी करून दिली. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाप्रमाणे संगीत रंगभूमीसाठी इथेही अभ्यासक्रमात सुधारणा व्हावी, संगीत नाटके ही मराठी रंगभूमीची जगाला भेट आहे. मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, असेही त्या म्हणाल्या.

संमेलनाचे उद्घाटक, ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी मराठी रंगभूमी अधिक व्यावसायिक झाली पाहिजे, प्रायोगिक कलांचे व्यावसायिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळणे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गेल्या २५ वर्षांमधील बदलांच्या पार्श्वभूमीवर नाटकाचे आर्थिक, सामाजिक निकष काय असावेत यासंदर्भात रंगकर्मींनी चिंतन करावे, असे आवाहन त्यांनी केले. बदलत्या समाजप्रवाहांचा वेध घेताना महात्मा फुले लिहिलेले 'तृतीयरत्न' हे नाटक १८५६ मध्ये प्रकाशित झाले असते, तर मराठी रंगभूमीच्या धारेला व्यापकता मिळाली असती, असेही विवेचन त्यांनी केले.

संमेलनाचे माजी अध्यक्ष जयंत सावरकर यांनी नाट्यगृहाच्या प्रश्नाबाबत हात टेकले, अशा शब्दांमध्ये आपली भावना व्यक्त केली. शहरांजवळील खेड्यांमध्ये नाटक पोहोचले पाहिजे, यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यामध्ये अपयश आल्याचे त्यांनी अध्यक्षीय पदाचा निरोप घेताना सांगितले.

माध्यमांचा मारा झाला, तरी चांगल्या नाटकांना प्रतिसाद मिळतो, असा आशावाद स्वागताध्यक्ष विनोद तावडे यांनी व्यक्त केला. तर मराठी रसिक जिथे आहेत तिथपर्यंत पोहोचण्याचा संकल्प अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी व्यक्त केला. शरद पोंक्षे यांनी या सोहळ्याचे प्रास्ताविक केले. सोहळ्यामध्ये ज्येष्ठ रंगकर्मी सई परांजपे, विजया मेहता, मोहन जोशी आणि प्रशांत दामले यांचा सत्कार करण्यात आला.

गर्दी आणि सेलिब्रिटी

उद्घाटन सोहळ्यासाठी सुधा करमरकर रंगमंच आणि कालिदास नाट्यगृहाचे मुख्य सभागृह येथे तुंडुंब गर्दी जमली होती. अरुण काकडे, सुहास जोशी, जब्बार पटेल, नीना कुलकर्णी, वंदना गुप्ते, सोनाली कुलकर्णी, वैभव मांगले, ऋतुजा बागवे आदी रंगकर्मी आवर्जून उपस्थित होते.

तिसरी घंटा

ज्येष्ठ अभिनेत्री फय्याज आणि संगीत मत्स्यगंधा नाटकाच्या कलाकारांनी नांदी सादर केली. ज्येष्ठ रंगमंच कामगार उल्हास सुर्वे यांनी तिसरी घंटा वाजवून उद्घाटन सोहळा सुरू झाल्याचे अधोरेखित केले.

पदाधिकारी गायब

उद्घाटन सोहळ्यावेळी काही पदाधिकारी रंगमंचासमोर तर काही रंगमंचाच्या बाजूला उभे असलेले दिसले. रंगमंचावर दिसावे ही अनेकदा पदाधिकाऱ्यांची अपेक्षा असते. मात्र पदाधिकाऱ्यांची गर्दी रंगमंचावरून गायब असल्याने रंगमंच सुटसुटीत वाटल्याचे प्रेक्षकांनी आवर्जून सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज