म. टा. प्रतिनिधी, मुंबई
'भारतीय लष्कराने पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात रणभूमीवर विजय मिळवला. पण युद्धानंतर सामरिक दृष्टिकोनाचा अभाव होता. त्यात आपण कमी पडलो. त्यामुळे इतिहास व भूगोल, हे दोन्ही भारताविरुद्ध गेले', असे परखड मत निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी व्यक्त केले. दादर येथील अमर हिंद सेवा मंडळाच्या वसंत व्याख्यानमालेत 'भारताची सामरिक सिद्धता' या विषयावर बोलताना त्यांनी हे मत मांडले.
धोरणात्मक निर्णयक्षमता आणि त्याचे होणारे दूरगामी परिणाम यावर भाष्य करताना त्यांनी सर्वात आधी १९६२चे युद्ध व त्यातील पराभवाची परखड मीमांसा केली. 'देशाच्या सामरिक सज्जतेत अडथळा नको, हे या युद्धाने दाखवून दिले. सैन्यदलांची विशेषत: हवाई तसेच अवकाश क्षेत्रातील सामरिक सिद्धता ही मूलतः सामर्थ्यशाली आहे. त्या अनुषंगाने सैन्यदलांचा उल्लेख हा केवळ संरक्षण सेना नव्हे तर सशस्त्र सेना, असा व्हावा. ते आपल्या कणखर मानसिकतेचे प्रतीक आहेत', असे ते म्हणाले.
हवाई दल व एकूण तिन्ही सशस्त्र दले आज तंत्रज्ञानसज्ज होत आहेत. याबाबत एअर मार्शल गोखले म्हणाले, 'विज्ञान-तंत्रज्ञानात सातत्याने होणारे बदल तसेच प्रगती यांचा सामरिक सिद्धतेवर होणारा प्रभाव मोठा असतो. युद्धतंत्रात त्यानुसार होणाऱ्या बदलांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. मानवविरहीत वाहने, कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास, सौरशक्ती तसेच अणुशक्तीद्वारे विकसित होणारी शस्त्रास्त्रे आदी बदल लक्षात घेताना तंत्रज्ञानातील अद्ययावतता सामरिक सज्जतेत फार महत्त्वाची ठरते.'
सामरिक सज्जतेचे परराष्ट्र धोरण तसेच अंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी यासंबंधीचे महत्त्वही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भारतीय हवाई दलाचा प्रवास उलगडताना त्यांनी शस्त्रसज्जतेचा आढावा घेतला. अवकाश संशोधन क्षेत्रातील प्रगतीचे महत्त्व मांडताना त्यांनी हवाई दल, अवकाश संशोधन आणि धोरणात्मक निर्णय क्षमता यांचा समन्वय वाढावा यासाठी 'संयुक्त एअरो स्पेस कमिशन'च्या स्थापनेची गरज मांडली.