अ‍ॅपशहर

ठाण्यातील रक्तपेढ्यांमध्ये तंत्रज्ञांची कमतरता; रुग्णांची मुंबईकडे धाव

आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्यामुळे ठाण्यातील अनेक रुग्णांना मुंबईला धाव घ्यावी लागली. तर ठाण्यातील रक्तपेढ्यांमधील तंत्रज्ञांच्या कमतरतेमुळे रक्ताच्या उपलब्धतेसाठी करोना काळामध्ये ठाणेकरांना मुंबईवर अवलंबून राहावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Authored byशर्मिला कलगुटकर | महाराष्ट्र टाइम्स 20 Sep 2020, 7:33 am
मुंबई : आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्यामुळे ठाण्यातील अनेक रुग्णांना मुंबईला धाव घ्यावी लागली. तर ठाण्यातील रक्तपेढ्यांमधील तंत्रज्ञांच्या कमतरतेमुळे रक्ताच्या उपलब्धतेसाठी करोना काळामध्ये ठाणेकरांना मुंबईवर अवलंबून राहावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ०रक्तपेढ्यांमध्ये तंत्रज्ञांची कमतरता (प्रातिधिक फोटो)


रक्तातून संसर्ग होऊ नये तसेच रक्तपेढ्यांचे काम सुरळीत व्हावे यासाठी 'नॅको'ने नियमावली तयार करून रक्तपेढीमधील कर्मचारीसंख्या निश्चित केली आहे. मात्र ठाण्यातील (कोकण विभाग) अन्न व औषध प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीस रक्तपेढ्यांमध्ये एकूण १४६ कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे रक्ताची उपलब्धता, प्रक्रिया आणि करोना संसर्गाच्या काळामध्ये प्लाझ्मा थेरपी देण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचा मोठा तुटवडा येथे निर्माण झाला आहे.

'नॅको'च्या नियमावलीनुसार ज्या रक्तपेढ्यांचे वार्षिक रक्तसंकलन पाच हजार युनिटपेक्षा कमी आहे त्यांच्याकडे पाच तंत्रज्ञ, रक्तदानशिबिरांचे आयोजन करण्यासाठी तीन, रक्त विघटीकरणासाठी एका तांत्रिक निरीक्षकाची गरज असते. एकूण दहा तांत्रिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता असतानाही अनेक रक्तपेढ्या या एक तसेच दोन तंत्रज्ञांच्या जिवावर कामाचा गाडा ओढत आहेत. ३७ रक्तपेढ्यांपैकी केवळ सात रक्तपेढ्यांनी मनुष्यबळाच्या पूर्ततेचे निकष पूर्ण केले आहेत. निकषांची पूर्तता झाली नसेल तर त्या रक्तपेढीचा परवाना रद्द करणे किंवा ना हरकत प्रमाणपत्र नाकारण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासन तसेच राज्य रक्त संक्रमण परिषदेला आहे. मात्र या तीस रक्तपेढ्यांच्या संदर्भात हा निर्णय का घेण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अनेक ठिकाणी तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता होत नसल्याच्या तक्रारी येतात, तर काही खासगी रक्तपेढ्यांमध्ये पुरेसे वेतन दिले जात नसल्यानेही मनुष्यबळाची उपलब्धतेमध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अशा रक्तपेढ्यांमध्ये चोवीस तास काम करणे, शिबिरांमध्ये जाऊन रक्त गोळा कऱण्यासह करोना काळामधील प्लाझ्माच्या उपलब्धतेसंदर्भातील निकषांची पूर्तता करण्याचे काम कसे पूर्ण केले जाते, असा प्रश्न उपस्थित होतो.

कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या

२३ खासगी रक्तपेढ्यांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे, तर तीन सरकारी रक्तपेढ्या या निकषांची पूर्तता न करता चालवल्या जात आहे. सोळा रक्तपेढ्यामध्ये प्लाझ्मा विघटनासाठी लागणारी अफेरेसिस तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध नाही. यासंदर्भात एफडीएचे आयुक्त अरुण उन्हाळे व राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहा. संचालक डॉ. अरुण थोरात यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

रक्तपुरवठा पुरेसा नाही

मुंबईतील रक्तदानाची परिस्थिती लक्षात घेता सध्या समाधानकारक स्थिती असली तरीही हा रक्तपुरवठा पुरेसा नाही. लो. टिळक रुग्णालयामध्ये ए पॉझीटीव्ह १, एबी -८, ओ- ३० राजावाडीमध्ये ए -६, बी - १, एबी -६, ओ- ० अशा प्रकारच्या रक्ताची उपलब्धता आहे. या रक्तपेढ्यांमध्ये सध्या १५० ते २०० रक्ताच्या पिशव्या उपलब्ध आहेत. करोना काळामध्ये त्या मुंबईतील रुग्णांचीच गरज पूर्ण करणाऱ्या नाहीत. एकट्या लो. टिळक रुग्णालयातील २८० थॅलेसेमिया रुग्णांना रक्ताची गरज असते.
लेखकाबद्दल
शर्मिला कलगुटकर
शर्मिला कलगुटकर या महाराष्ट्र टाइम्स च्या मुंबई आवृत्तीमध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. त्यांना पत्रकारितेमध्ये २१ वर्षाचा अनुभव आहे. त्या आरोग्य, सामाजिक, जेंडर अशा विविध विषयांवर त्यांनी सातत्यापूर्ण लिखाण आणि वार्तांकन करतात. आरोग्यक्षेत्रातील अनेक गैरप्रकारांना त्यांनी शोधपत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. या कार्याची दखल घेत त्यांना पत्रकारितेतील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज