मुंबई: यंदा मंदीचा फटका गणेशोत्सवालाही बसला असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा लालबागच्या राजाला अर्पण करण्यात आलेली रोकड आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांत घट झालेली पाहायला मिळत आहे.
या वर्षी गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्याही रोडावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मंदीबरोबरच मुसळधार पाऊस हेही या परिस्थितीचे एक कारण असू शकते असे पोलिसांचे म्हणणे आहे.
गेल्या गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या चरणी ६.५५ कोटी रुपयांची रक्कम अर्पण करण्यात आली होती. या वर्षी मात्र, ५.०५ कोटी इतकी रोकड गोळा झाली असल्याचे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे माजी पदाधिकारी सुधीर साळवी यांनी माहिती देताना सांगितले.
गेल्या वर्षी गणेशभक्तांनी ५ किलो सोने आणि ८० किलो चांदी अर्पण केली होती. या वर्षी मात्र ३.७५ किलो सोने आणि ५६.७ किलो इतकीच चांदी अर्पण करण्यात आली आहे. ही घट पावसामुळे आणि मंदीमुळे झाली असावी असे साळवी यांचे म्हणणे आहे.
भक्तांच्या सख्येत मात्र वाढ
असे असले तरी लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांच्या संख्येत घट न होता वाढच झाल्याचे साळवी सांगतात. गेल्या वर्षी मंडळाने १.६२ लाख लाडू विकले होते, यंदा मात्र १.८६ लाख लाडवांची विक्री झाल्याचे साळवी म्हणाले.
या वर्षी सर्वात महागडी भेटवस्तू सोन्याचे ताट आणि वाट्यांची असल्याचे साळवी म्हणाले. या वस्तूंची किंमत १.८६ लाख रुपये असल्याचे साळवी म्हणाले. यंदा १ किलो वजनाचा सोन्याचा पट्टाही मिळाला आहे. शिवाय या वस्तूंमध्ये सोन्याचा मुलामा दिलेल्या चांदीच्या पावलांचाही समावेश आहे.