म. टा. प्रतिनिधी, मुंबई करोनावर आपण विजय मिळवणारच, या निर्धारात कदापी तडजोड करायची नाही, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना केले. या लॉकडाऊनमुळे आपल्या सवयींमध्ये बदल करण्याची शिकवण मिळाल्याचे नमूद करतानाच करोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट पाहता येत्या काळात वैयक्तिक जीवनात काटकसरीने काम करा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. 'डॉक्टरांनी सेवा देण्याचे काम थांबवू नये. दवाखान्यांचे दरवाजे सताड उघडे ठेवा', असे आवाहन पवार यांनी ओपीडी बंद करणाऱ्या डॉक्टरांना केले. आज आणि उद्याच्या परिस्थितीला तोंड देऊन सरकार करोनावर मात करू शकते. आपल्या विजयाच्या निर्धारात तडजोड करायची नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असेही ते म्हणाले. 'दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढत असले तरी काही रुग्ण घरी जात आहेत. ही जमेची बाब आहे. पाश्चिमात्य देशात विशेषतः अमेरिका, स्पेनची सध्या भयावह उदाहरणे आहेत. त्या रस्त्याला आपल्याला जायचे नाही. आपल्याला मिळालेल्या सूचनांचे पालन करूया', असे आवाहन पवार यांनी केले. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, छगन भुजबळ, अनिल देशमुख, जयंत पाटील, त्यांचे सचिव, अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील सर्वजण अहोरात्र कष्ट घेऊन सर्वांना आधार देत आहेत. या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.
'लॉकडाऊनमुळे मिळाली शिकवण'
म टा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Mar 2020, 4:00 am