म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
बाधकामांचा ढिसाळ दर्जा, व्यवस्थापनाच्या नावाने असणारी बोंब यांमुळे 'म्हाडा'ने बांधलेल्या शौचालयांचा धसका सर्वसामान्यांनी घेतला आहे. भांडुपमधील पाटीलवाडीमध्ये शौचालय खचून दोन निरपराध व्यक्तींचा मृत्यू झाला. हे शौचालय पुन्हा कुणी उभारायचे यावरून आता मतमतांतरे सुरू आहेत. काहीही करा; पण, नव्याने उभे राहणारे शौचालय 'म्हाडा'चे नको, अशी स्पष्ट भूमिका येथील रहिवाशांनी घेतली आहे.
बांधकामाचा दर्जा निकृष्ट असतोच, पण शौचालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी कुणाची, यावरून पालिका आणि म्हाडा या दोहोंमध्ये सातत्याने जुंपते. माणसे टाकीचे स्फोट होऊन, शौचालय खचून मरतात, पण त्यांची कुटुंबे वाऱ्यावर पडतात, असे पाटीलवाडीतील स्थानिक रहिवासी रमेश पाटील सांगतात. कधी पाणी आहे, तर वीज नाही. वीज आहे, पण स्वच्छता नाही, असा सवळागोंधळ या शौचालयाच्या व्यवस्थापनामध्ये दिसतो. यापूर्वी महाराष्ट्र नगरसह विद्याविहारमधील बंजारा वस्ती, मंडाला येथे झालेल्या अशा दुर्घटनांमध्येही व्यवस्थापनाची उदासीन वृत्ती दिसून आली आहे, याकडे सार्वजनिक शौचालयाच्या मुद्द्यावर हिरीरीने कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते दयानंद जाधव यांनी लक्ष वेधले.
मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळांतर्गत असलेल्या शौचालयांची देखभाल व दुरुस्तीची कामे आमदार फंडातून करण्यात येतात. एकाच लोकप्रतिनिधींचे निकटचे कंत्राटदार ही कामे करत असल्याने या कामांचा दर्जा योग्य नसतो, असाही आक्षेप भांडुपवासीयांनी या दुर्घटनेनंतर नोंदवला आहे.
टाक्यांचे व्यवस्थापन करणार कसे?
शौचालयाच्या खाली बांधण्यात आलेल्या टाक्यांमध्ये मैल्यातून निर्माण होणारा वायू टाकीबाहेर जाण्यासाठी मार्ग बनवलेला असतो. मात्र, हा मार्ग नेमका कोणत्या कारणांसाठी तयार केलेला आहे याची माहिती सर्वसामान्यांना देण्यात येत नाही. त्यामुळे मुले खेळताना त्यात दगड-माती टाकतात. अनेक महिला घरातील खरकटेही त्यात टाकतात. त्यामुळे हा मार्ग बंद होतो. 'म्हाडा'च्या अनेक शौचालयांमध्ये मैला वाहून नेणाऱ्या टाक्या या शौचकुपाच्या बरोबर खालीच बसवलेल्या आहेत. त्यामुळे वायुउत्सर्जनाचे मार्ग बंद झाल्यावर त्यांचे स्फोट होण्याच्या दुर्घटना सातत्याने घडतात. दुरुस्तीच्या नावाखाली स्थानिक लोकप्रतिनिधी शौचालयांची वरवरची मलमपट्टी करतात. पण, टाक्या साफ करण्याची गरज असते, याकडे मात्र सपशेल दुर्लक्ष केले जाते. याकडे स्थानिक रहिवाशी तानाजी अर्जुन लक्ष वेधतात. सर्वसामान्यांना शौचालयांच्या व्यवस्थापनाबाबतची नेमकी माहिती दिली जात नाही. सार्वजनिक शौचालयांच्या शेजारीच्या वस्त्यांमध्ये तसे फलकही लावले जात नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांकडूनही अजाणतेपणी चुका होत जातात.
(वाट स्वच्छ आरोग्याची)