म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
रेल्वेच्या तिन्ही उपनगरी मार्गांवरील रविवारचा मेगाब्लॉक रद्द केल्याने रक्षाबंधनासाठी कुटुंबकबिल्यासह मोठ्या उत्साहात निघालेल्या हजारो प्रवाशांचे प्रचंड गर्दीमुळे प्रचंड हाल झाले. सकाळपासूनच मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्सहार्बर मार्गावर गर्दीमुळे गोंधळ माजला होता. लोकलप्रवास टाळण्यासाठी रस्त्याचा पर्याय निवडलेलेही जागोजागी अडकून पडले होते. सकाळपासूनची ही 'भाऊगर्दी' रात्रीपर्यंत कायम होती.
रक्षाबंधनाच्या दिवशी पूर्व, पश्चिम, दक्षिण मुंबईप्रमाणेच ठाणे, नवी मुंबईसह वेगवेगळ्या भागात ये-जा करणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. रक्षाबंधनासाठी सकाळपासून निघालेल्यांना रस्त्याप्रमाणेच लोकलमधील गर्दीचा सामना करावा लागला. महामार्गांप्रमाणेच छोटेमोठे रस्तेही वाहतूककोंडीत अडकले होते. दूर अंतरावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत लोकलमधून प्रवास करणे कठीण ठरले. रक्षाबंधनाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने रविवारी मेगाब्लॉक टाळला. पण त्यामुळे लोकलमधील गर्दी कमी न होता आणखीच वाढल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते.
मध्य रेल्वेवर दादर, ठाणे, कुर्ला, विक्रोळी, कल्याण, डोंबिवली, वाशी, बेलापूर, ऐरोलीसह पश्चिम रेल्वेवरील स्थानके तसेच लोकलही भरून वाहात होत्या. पूर्व द्रूतगती महामार्ग, पश्चिम द्रूतगती महामार्ग, एलबीएस, लिंक रोड, जेव्हीएलआर, एस. व्ही. रोडसह सर्वच मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सणामुळे रिक्षा, टॅक्सी, ओला, उबरचा पर्याय स्वीकारल्याने या वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे सर्वच भागातील रस्त्यांची कोंडी झाली होती.
मुंबई गाठण्याचे दिव्य
रेल्वेच्या तिन्ही उपनगरी मार्गांवर रविवारच्या रक्षाबंधनाच्या दिवशी हजारो प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला. ठाणे, बोरिवली व त्यापुढील प्रवाशांना मुंबई गाठण्यासाठी दिव्य पार करावे लागत होते. रक्षाबंधनासाठी कुटुंबकबिल्यासह घराबाहेर पडणाऱ्यांची संख्याही जास्त असल्याने लोकलमध्ये गर्दी वाढली होती. मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर रविवारी दिवसभर हेच चित्र होते. भरभरून वाहणाऱ्या लोकल आणि हालअपेष्टा सहन करत लोकल प्रवास करावा लागत होता. रक्षाबंधनाच्या दिवशी लोकलप्रमाणेच रस्तेमार्गाने मोठ्याप्रमाणात वाहने ये-जा करतात. केवळ रविवारच नव्हे शनिवारीही सर्व रस्त्यांवर कोंडीचा अनुभव येत होता. खड्ड्यांपासून वेगवेगळ्या कारणांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत वाहतूककोंडीने कळस गाठला आहे. त्याचा प्रत्यय शनिवारी रात्रीही आला. ठाणे, नवी मुंबई, भिवंडीसह अन्य ठिकाणी वाहतूककोंडीचा फटका प्रवाशांना बसला.
वक्तशीरपणा बिघडलेलाच
रेल्वेने वक्तशीरपणा वाढवावा, अशी सूचना काही दिवसांपूर्वीच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली होती. साधारण ९० टक्क्यांपर्यंत वक्तशीरपणा राखण्यासाठी नोव्हेंबरपर्यंत अवधी दिला आहे. पण तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेच्या अखत्यारितील रेल्वे फाटकांमुळे वेळापत्रक विस्कळीत होण्याचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. मध्य रेल्वेवर दररोज १७००हून अधिक फेऱ्या चालतात. त्यातील काही फेऱ्या वेगवेगळ्या कारणांनी चालवण्यात अडचणी येत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
रेल्वेच्या तिन्ही उपनगरी मार्गांवरील रविवारचा मेगाब्लॉक रद्द केल्याने रक्षाबंधनासाठी कुटुंबकबिल्यासह मोठ्या उत्साहात निघालेल्या हजारो प्रवाशांचे प्रचंड गर्दीमुळे प्रचंड हाल झाले. सकाळपासूनच मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्सहार्बर मार्गावर गर्दीमुळे गोंधळ माजला होता. लोकलप्रवास टाळण्यासाठी रस्त्याचा पर्याय निवडलेलेही जागोजागी अडकून पडले होते. सकाळपासूनची ही 'भाऊगर्दी' रात्रीपर्यंत कायम होती.
रक्षाबंधनाच्या दिवशी पूर्व, पश्चिम, दक्षिण मुंबईप्रमाणेच ठाणे, नवी मुंबईसह वेगवेगळ्या भागात ये-जा करणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. रक्षाबंधनासाठी सकाळपासून निघालेल्यांना रस्त्याप्रमाणेच लोकलमधील गर्दीचा सामना करावा लागला. महामार्गांप्रमाणेच छोटेमोठे रस्तेही वाहतूककोंडीत अडकले होते. दूर अंतरावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत लोकलमधून प्रवास करणे कठीण ठरले. रक्षाबंधनाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने रविवारी मेगाब्लॉक टाळला. पण त्यामुळे लोकलमधील गर्दी कमी न होता आणखीच वाढल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते.
मध्य रेल्वेवर दादर, ठाणे, कुर्ला, विक्रोळी, कल्याण, डोंबिवली, वाशी, बेलापूर, ऐरोलीसह पश्चिम रेल्वेवरील स्थानके तसेच लोकलही भरून वाहात होत्या. पूर्व द्रूतगती महामार्ग, पश्चिम द्रूतगती महामार्ग, एलबीएस, लिंक रोड, जेव्हीएलआर, एस. व्ही. रोडसह सर्वच मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सणामुळे रिक्षा, टॅक्सी, ओला, उबरचा पर्याय स्वीकारल्याने या वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे सर्वच भागातील रस्त्यांची कोंडी झाली होती.
मुंबई गाठण्याचे दिव्य
रेल्वेच्या तिन्ही उपनगरी मार्गांवर रविवारच्या रक्षाबंधनाच्या दिवशी हजारो प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला. ठाणे, बोरिवली व त्यापुढील प्रवाशांना मुंबई गाठण्यासाठी दिव्य पार करावे लागत होते. रक्षाबंधनासाठी कुटुंबकबिल्यासह घराबाहेर पडणाऱ्यांची संख्याही जास्त असल्याने लोकलमध्ये गर्दी वाढली होती. मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर रविवारी दिवसभर हेच चित्र होते. भरभरून वाहणाऱ्या लोकल आणि हालअपेष्टा सहन करत लोकल प्रवास करावा लागत होता. रक्षाबंधनाच्या दिवशी लोकलप्रमाणेच रस्तेमार्गाने मोठ्याप्रमाणात वाहने ये-जा करतात. केवळ रविवारच नव्हे शनिवारीही सर्व रस्त्यांवर कोंडीचा अनुभव येत होता. खड्ड्यांपासून वेगवेगळ्या कारणांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत वाहतूककोंडीने कळस गाठला आहे. त्याचा प्रत्यय शनिवारी रात्रीही आला. ठाणे, नवी मुंबई, भिवंडीसह अन्य ठिकाणी वाहतूककोंडीचा फटका प्रवाशांना बसला.
वक्तशीरपणा बिघडलेलाच
रेल्वेने वक्तशीरपणा वाढवावा, अशी सूचना काही दिवसांपूर्वीच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली होती. साधारण ९० टक्क्यांपर्यंत वक्तशीरपणा राखण्यासाठी नोव्हेंबरपर्यंत अवधी दिला आहे. पण तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेच्या अखत्यारितील रेल्वे फाटकांमुळे वेळापत्रक विस्कळीत होण्याचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. मध्य रेल्वेवर दररोज १७००हून अधिक फेऱ्या चालतात. त्यातील काही फेऱ्या वेगवेगळ्या कारणांनी चालवण्यात अडचणी येत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.