म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
दिवाळीच्या प्रकाशरंगामध्ये सारा माहोल तेजोमय झाला असतानाच मुंबईकरांनी सामाजिक बांधिलकीची वीणही जपली. अनाथाश्रम, वृद्धाश्रम, बालगृहे तसेच विविध प्रकारच्या सामाजिक संस्थांना फराळ, भेटवस्तू देऊन मुंबईकरांनी दिवाळीचा आनंद अधिक प्रकाशमान केला. यंदा या सामाजिक संस्था तसेच वृद्धाश्रमांना मदत करणाऱ्यांमध्ये युवावर्गाचे प्रमाण अधिक होते.
घाटकोपर, अंधेरी, बोरिवली, महालक्ष्मी येथे असलेल्या लहान मुलांच्या संस्थांना भेट देण्यासाठी मुंबईकरांनी खाऊ, थंडीचे कपडे, फराळासह नव्या कोऱ्या पुस्तकांनाही पसंती दिली. 'दिवाळीच्या गजबजाटापासून दूर अशा अनाथाश्रमे, वृद्धाश्रमांमध्ये राहणारी मुले, ज्येष्ठ नागरिकांना आप्तांची, कुटुंबाची ओढ लागलेली असते. अशावेळी आपुलकीने चौकशी करणारे, सणासुदीच्या वेळी प्रेमाने, मायेने जवळ घेणारे कुणी आले की त्यांनाही दिलासा मिळतो. सणाचा आनंद आपल्या माणसांसह घेतल्याचे समाधान त्यांना मिळते', असे आश्रय वृद्धाश्रमाच्या संचित बेलोस आवर्जून सांगतात.
एकेकाळी मानखुर्द येथील संस्थेमध्ये राहिलेली अनाथ मुले आज स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभी आहेत. या संस्थेमधून शिक्षण घेऊन स्वावलंबी झालेले अनेकजण दिवाळीच्या दिवशी आवर्जून संस्थेमध्ये जातात. तेथील अनाथ मुलांना भेटवस्तू, पुस्तके, कपडे भेट देतात. स्वतः त्या संस्थेमध्ये व्यतित केलेले बालपण लक्षात ठेवून या मुलांना आनंद मिळावा यासाठी हे सगळेजण आवर्जून संस्थेला भेटी देतात.
भेटवस्तूंपेक्षा आपुलकीची आस
'वृद्धाश्रमातील अनेक ज्येष्ठ नागरिक आजारी असतात, व्याधीग्रस्त असतात. त्यांना भेटवस्तूंपेक्षा मायेने जवळ बसणारे, आपुलकीने चौकशी करणारे, प्रेमाने हात हातात घेणाऱ्या व्यक्ती हव्या असतात, पण अनेकदा हा आधार मिळत नाही. दिवाळीच्या दिवशी अव्यक्त सोबत देणाऱ्या युवावर्गाचे प्रमाण वाढते आहे. यातील अनेक तरुण सुट्टीच्या वेळी आवर्जून येतात, चौकशी करतात, भेटवस्तू नाही आणली तरीही सोबत काही वेळ व्यतित करतात. हा आनंद कोणत्याही प्रकारच्या पैशामध्ये मोजला जाणारा नाही', असे स्नेहआनंद संस्थेचे विकास म्हात्रे सांगतात.
'दिवाळीचा आनंद प्रत्येकाला मिळावा'
'यापूर्वी प्रत्येक दिवाळी आम्ही मुंबईत कुटुंबासोबत, मित्रांसोबत साजरी करायचो. मागील काही वर्षांपासून जव्हार, मोखाडा या आदिवासी भागामध्ये जाऊन एक दिवस तिथे दिवाळी साजरी करतो. मुलांनाही तिथे घेऊन जातो. त्यामुळे शहरापासून काही अंतरावर असलेल्या मुलांचं जगणं त्यांच्याही लक्षात येतं. सामाजिक बांधिलकी हे शब्द मोठे आहेत. पण दिवाळीचा आनंद प्रत्येकाला मिळायला हवा, ही भावना मनात ठेवायला हवी', असे मत समीर आशा मोहन याने व्यक्त केले.