अ‍ॅपशहर

कोश्यारी आणि वाद! महाराष्ट्राच्या माजी राज्यपालांची वादग्रस्त वक्तव्यं, कशामुळे सापडले अडचणीत?

political news : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गेल्या काही काळात अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यापासून मुंबई आणि मराठी माणसाबाबत विधानं करुन कोश्यारींनी वाद निर्माण केले होते

Authored byअनिश बेंद्रे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Feb 2023, 10:28 am
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद हे समीकरण नवीन नाही. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात कोश्यारी यांनी राज्यपालपदावरुन मुक्त होण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानिमित्ताने कोश्यारी आणि त्यांनी केलेल्या वक्तव्यांवरुन निर्माण झालेले वाद पुन्हा चर्चेत आले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Bhagatsingh Koshyari
भगतसिंह कोश्यारी


छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्य


"आम्ही जेव्हा शाळेत जायचो, तेव्हा आमचे शिक्षक विचारायचे, की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. महाराष्ट्र नवरत्नांची खाण आहे. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील." असं भगतसिंह कोश्यारी म्हणाल्याने वाद निर्माण झाला होता.

मुंबईचं गुजराती कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न

याआधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईबाबत एक विधान केलं होतं. "मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांनी आपला पैसा काढून घेतला, तर मुंबईत पैसा शिल्लक तरी राहिल का?" असा सवाल त्यांनी विचारला होता. मुंबईत गुजराती आणि राजस्थानी लोकांचं मोठं योगदान असून त्यामुळेच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

सावित्रीबाईंविषयी बोलताना जीभ घसरली

त्यापूर्वी सावित्रीबाई फुले यांच्या लग्नाविषयी बोलताना कोश्यारींची जीभ घसरली होती. सावित्रीबाईंचं लग्न वयाच्या दहाव्या वर्षी झालं होतं. त्यावेळी ज्योतिबा फुले हे तेरा वर्षांचे होते. लग्न झाल्यावर या वयातील मुलं पुढे काय करतात, असा सवाल हसत हसत त्यांनी विचारल्यानंतर टीकेची झोड उठली होती.

हेही वाचा : अगोदर शाहांना स्पष्टीकरण,राष्ट्रपतींना पत्र लिहिण्याऐवजी मोदींना विनंती, कोश्यारींच्या मनात काय? चर्चा सुरु
गुरु-शिष्यावर बोलतानाही शिवरायांचा अवमान

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत कोश्यारींनी याआधीही वादग्रस्त विधान केलं होतं. गुरुची महती पटवून देण्याच्या नादात त्यांनी एक विधान केलं होतं. चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल आणि समर्थ रामदासांशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा कोण विचारेल? असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला.

हेही वाचा : मुख्यमंत्री साहेब, माझ्या श्रीकांतला आमदार करा, मग बघा... माऊलीचं एकनाथ शिंदेंना पत्र
लेखकाबद्दल
अनिश बेंद्रे
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा 'मास्टरमाईंड' | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज